नारायणगाव : ‘राज्य सरकारने संस्थेद्वारे शेतकऱ्यांचा टोमॅटो, कांदा, बटाटा हा शेतमाल थेट दिल्ली आणि मुंबई येथे पाठविला, तर त्या वाहतुकीचा खर्च केंद्र सरकार देणार आहे. याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे,’ असे केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले.
विकसित कृषी संकल्प अभियानांतर्गत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजार केंद्रात पदयात्रा आणि कृषी विज्ञान केंद्र येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, केंद्रीय कृषी विभागाचे सहसचिव फ्रक्लीन खोंडग, कृषी आयुक्त सूरज मांढरे, उपमहासंचालक डॉ. एस. के. सिंग, संचालक डॉ. एस. के. रॉय, कृषी विज्ञान केंद्राचे चेअरमन अनिल तात्या मेहेर, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार शरद सोनवणे, माजी आमदार अतुल बेनके, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा आदी उपस्थित होते.
शिवराजसिंह चौहान म्हणाले, ‘विविध भागांत शेती उत्पादने वेगळ्या प्रकारे घेतली जावीत, यासाठी केंद्र आणि राज्य सरकार काम करत आहे. टोमॅटोमध्ये विशेष संशोधन करण्याची गरज आहे. फक्त भाजीपुरता टोमॅटो न ठेवता, तो टिकाऊ आणि भाजीव्यतिरिक्त अन्य ठिकाणी वापरला जाऊ शकतो. त्यासाठी टोमॅटो बियाण्यावर संशोधन होणे आवश्यक आहे.’
‘कृषिमंत्री आणि कृषी विभाग शेतकऱ्यांच्या बांधावर जोपर्यंत जात नाही, संवाद साधत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. केंद्राच्या कृषी विभागांतर्गत १६ हजार शास्त्रज्ञ आहेत. ते कृषी खात्याच्या प्रयोगशाळा किंवा कार्यालयात असतात. ते शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत नाहीत, तोपर्यंत शेतीमध्ये प्रगती होणार नाही. त्यामुळे हे अभियान सुरू करण्यात आले आहे. ओडिशा येथून अभियानाला सुरुवात केली असून, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार येथून आता महाराष्ट्रात आलो आहे. त्यानंतर पंजाब आणि उत्तराखंडसह देशभर जाणार आहे.’
कृषी विज्ञान केंद्राचे चेअरमन अनिल तात्या मेहेर यांनी मनोगत व्यक्त केले. कृषिविस्तार विषय तज्ज्ञ राहुल घाडगे यांनी सूत्रसंचालन केले, तर रवींद्र पारगावकर यांनी आभार मानले.