पुणे : लाच प्रकरणात अडकलेले शिक्षक, तसेच शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची उघड चौकशी करण्यात यावी, असे पत्र शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) दिले आहे. शिक्षण आयुक्तांनी थेट ‘एसीबी’ला पत्र दिल्याने शिक्षण विभागातील लाचखोर अडचणीत येणार आहेत.

शिक्षण विभागातील शिक्षक, अधिकारी लाच घेताना पकडले गेले. लाच प्रकरणात त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येतो. मात्र, संबंधित अधिकारी किंवा शिक्षक पुन्हा सेवेत रूजू होतो. त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. त्यामुळे शिक्षण आयुक्त यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला पत्र देऊन लाचखोर अधिकारी आणि शिक्षकांची उघड चौकशी व्हावी म्हणून पत्र दिले आहे.मांढरे यांनी राज्यातील सर्व परिक्षेत्रातील (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) पोलीस अधिक्षकांना यापूर्वी पत्र पाठविले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पुणे कार्यालयातील पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी दुजोरा दिला आहे. शिक्षण आयुक्तांनी आम्हाला शिक्षण विभागातील लाचखोर अधिकारी आणि शिक्षकांची उघड चौकशी करावी, असे पत्र दिले आहे. जे शिक्षक, अधिकारी लाच घेताना पकडले गेले आहेत. त्यांची उघड चौकशी व्हावी, असे पत्रात म्हटले आहे, असे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी सांगितले.

हेही वाचा >>>शरद पवारांच्या मध्यस्थीनंतरही शिरूर मतदारसंघाचा तिढा सुटेना? विलास लांडेंच्या वक्तव्यानंतर चर्चेला पुन्हा सुरुवात

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यपद्धतीनुसार एखादा शासकीय कर्मचारी किंवा अधिकारी लाच प्रकरणात पकडला गेल्यास त्याची उघड चौकशी करण्यात येते. शिक्षण आयुक्तांचे पत्र आम्हाला मिळण्यापूर्वी पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यातील लाचखोर अधिकारी आणि शिक्षकांची उघड चौकशी सुरू केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिक्षण विभागात खळबळ

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सर्व परिक्षेत्रात शिक्षण विभागातील लाचखोर अधिकारी, शिक्षकांची चौकशी सुरू झाली आहे. शिक्षण आयुक्तांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला पत्र दिल्याने शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. या पत्राने शिक्षण विभागातील लाचखोर अडचणीत येणार असून त्यांच्यावर खातेअंतर्गत कठोर कारवाई हाेणार असल्याचे निश्चित झाले आहे.