आळंदी / पिंपरी- चिंचवड : पिंपरी – चिंचवडसह ग्रामीण भागातील सुमारे ५० लाख नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत असलेल्या आणि महाराष्ट्राच्या वारकरी सांप्रदायामध्ये श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला आता चालना मिळाली आहे. राज्य सरकारच्या नगर विकास विभागाच्या राज्यस्तरीय तांत्रिक समितीच्या (SLTC) मान्यतेचा प्रस्तावाला अखेर मान्यता मिळाली. त्यामुळे नदी सुधार प्रकल्पाचे काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला.

इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला चालना देण्यासाठी आणि पर्यावरण प्रेमी व स्वयंसेवी संस्था प्रकल्पाचा सुधारीत विकास आराखडा तयार करावा यासाठी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. विधानसभा अधिवेशनामध्ये राज्य सरकारचे लक्ष वेधले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे २०२२ मध्ये मागणी लावून धरली होती.

इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प अर्थात ‘‘नमामी इंद्रायणी’’साठी सर्व प्रशासकीय व तांत्रिक मान्यता, निधीची उपलब्धता याबाबत सातत्त्याने केलेले पाठवायला अखेर यश मिळाले आहे. विशेष म्हणजे, शहर आणि परिसरातील पर्यावरण प्रेमी संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींनी नदी सुधार प्रकल्पाचा विकास आराखडा अंतिम करताना महानगरपालिकेच्या Master plan मध्ये दर्शवल्यानुसार विविध ठिकाणी ६० एमएलडी क्षमतेचे मैलाशुद्धीकरण केंद्र सदर कामामध्ये प्रस्तावित केले आहे. तसेच, Water ATM, Public Toilet, Street Furniture, Chain link fencing compound wall आणि बायोडायव्हर्सिटी पार्क इत्यादी कामांचा समावेश करण्यात आला आहे.

केंद्र शासन पुरस्कृत अमृत २.० अभियानांतर्गत अंतर्गत राज्यस्तरीय तांत्रिक समितीची अपर मुख्य सचिव, (नवि-२) यांच्या अध्यक्षतेखाली सदर प्रकल्पांचा अनुषंगाने आज बैठक झाली. सदर बैठकीत इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाचा सविस्तर विकास आराखड्याला तांत्रिक समिमीची मान्यता मिळाली आहे.

“इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पातून नदीसंवर्धन, पूरनियंत्रण, पाण्यावर प्रक्रिया आणि सौंदर्यीकरण अशा चारही बाबी साध्य केल्या जाणार आहेत. एकूण ५२६ कोटींचा हा प्रकल्प असून, अमृत २.० अभियानांतर्गत तो राबविला जाणार आहे. ४० आणि २० एमएलडीचे हे दोन प्रकल्प असतील. यात पावसाचे पाणी साठवण्यासाठी जलनि:स्सारण प्रणाली, प्रदूषित पाणी मलनि:स्सारण प्रकल्पाकडे वळविण्यासाठी इंटरसेप्टर, पूर नियंत्रणासाठी दगडी बांधकाम करुन नदीच्या तटांचे सक्षमीकरण आणि नदीपात्राचे तटबंदीकरण, तसेच नदी तटावर हरित क्षेत्राचा विकास व वनसंवर्धनाद्वारे सुशोभिकरण अशी कामे एकत्रितपणे करण्यात येणार आहेत.” – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री.

“राज्यातील तमाम वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान आणि पिंपरी- चिंचवडकरांची जीवनवाहिनी असलेल्या इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यस्तरीय तांत्रिक समितीची मान्यता मिळाली. यापूर्वी प्रशासकीय मान्यता देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकार्य केले. भाजपा महायुतीच्या सरकारने पिंपरी- चिंचवडकरांना दिलेल्या शब्द खरा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.” – महेश लांडगे- आमदार, भाजपा, पिंपरी – चिंचवड.