पुणे : ‘समृद्धी महामार्गामुळे मुंबई ते नागपूर हा १८ तासांचा प्रवास ८ तासांवर आला आहे. याच धर्तीवर राज्यात ‘ॲक्सेस कंट्रोल ग्रिड’ची उभारणी करण्यात येणार आहे. या अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या महामार्गांच्या जाळ्यामुळे राज्याच्या एका टोकाहून दुसऱ्या टोकापर्यंत ८ तासांत प्रवास करता येईल,’ अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी केली.
क्रेडाई-पुणे मेट्रोच्या नवीन कार्यकारिणीच्या पदग्रहण कार्यक्रमात शिंदे बोलत होते. या वेळी क्रेडाईचे अध्यक्ष मनीष जैन, माजी अध्यक्ष रणजित नाईकनवरे, बांधकाम व्यावसायिक सतीश मगर व ललितकुमार जैन आदी उपस्थित होते. या वेळी शिंदे म्हणाले, ‘पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गामुळे प्रवासाचा वेग अतिशय कमी झाला. त्यातून पुण्यात माहिती-तंत्रज्ञान (आयटी) आणि सेवा क्षेत्राची मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्याचबरोबर शहरातील बांधकाम क्षेत्रातही तेजी निर्माण झाली. आता समृद्धी महामार्गामुळेही मोठा बदल घडत आहे. ‘समृद्धी’च्या धर्तीवर राज्यात ‘ॲक्सेस कंट्रोल ग्रिड’ म्हणजेच नियंत्रित महामार्गांचे जाळे उभारण्यात येणार आहे. त्यामुळे राज्याच्या कोणत्याही टोकावरून कोणत्याही टोकाला केवळ आठ तासांत पोहोचता येईल.’
‘मुंबई आणि ठाण्याप्रमाणे पुण्याचा विकास व्हावा, असा सरकारचा प्रयत्न आहे. पुण्यात मेट्रो आणि रस्त्यांची कामे सुरू आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम केली जात असून, तिचा वापर वाढणार आहे. त्यामुळे रस्त्यांवरील लहान वाहनांची संख्या कमी होऊन वाहतूककोंडी सुटण्यास मदत होईल. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) विकास आराखड्याचा प्रश्न न्यायालयात आहे. त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीने केला जाईल. पुण्यातील रस्ते खड्डेमुक्त व्हावेत आणि नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जातील,’ असेही शिंदे यांनी नमूद केले.
‘विकासकांच्या अडचणी तातडीने सोडविण्यासाठी पावले उचलली जाणार आहेत. त्यांना घ्याव्या लागणाऱ्या परवानग्या लवकरात लवकर मिळाव्यात, यासाठीही सरकार प्रयत्न करील,’ अशी हमीही त्यांनी दिली.
महायुती म्हणून आम्ही विधानसभा निवडणुका लढलो आणि जिंकलो. महायुतीने अडीच वर्षांत केलेल्या कामाची पावती म्हणून आम्हाला विधानसभा निवडणुकीत मोठा जनाधार मिळाला. यापुढील निवडणुकाही महायुती म्हणून लढू आणि जिंकू – एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री