कल्याण : कल्याणमधील शिवकालीन दुर्गाडी किल्ल्याची संरक्षक भिंत बुधवारी दुपारी मुसळधार पाऊस सुरू असताना अचानक कोसळली. मागील चार वर्षाच्या कालावधीत दुर्गाडी किल्ल्याची संरक्षक भिंत, बुरूज कोसळण्याचे प्रकार वाढत असल्याने या संपूर्ण किल्ल्याचे त्याचे मूळ स्वरूप कायम ठेऊन नुतनीकरण करण्यात यावे, अशी मागणी उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हाध्यक्ष विजय उर्फ बंड्या साळवी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

दुर्गाडी किल्ल्याच्या संरक्षक भिंत आणि इतर देखभाल दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियंत्रणाखाली सुरू आहे. ही कामे सुरू असताना किल्ल्याच्या बुरुजापासून संरक्षिक भिंत बुधवारी दुपारी मुसळधार पाऊस सुरू झाल्यावर कोसळली. सुदैवाने या भागात कोणी नसल्याने जीवित हानी झाली नाही. दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी काही विक्रेते व्यवसाय करतात. भिंत कोसळत असताना भिंतीचे धारदार दगड वेगाने किल्ल्याच्या पायथ्याशी घरंगळत आले. पाऊस सुरू असल्याने तेथे कोणी विक्रेता किंवा पादचारी नव्हता.

दुर्गाडी किल्ला हा शासनाचा असल्याचे आणि या किल्ल्यावरील देखभाल दुरुस्तीची कामे जिल्हा प्रशासनाच्या नियंत्रणाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाने करायची आहेत, असे निर्देश काही महिन्यापूर्वी न्यायालयाने दिले आहेत. याप्रकरणी हिंदुत्ववादी संघटनेचे प्रतिनिधी आणि मुस्लिमांच्या मुशायरे मजलिस संस्थेकडून याप्रकरणी न्यायालयात दावे, प्रतिदावे सुरू आहेत. दुर्गाडी किल्ला शिवकालीन किल्ला आहे. दुर्गा देवीचे स्थान या किल्ल्यावर आहे. दु्र्गाडी किल्ला हा प्रत्येक भाविकाच्या श्रध्देचा, भावनेचा विषय आहे. त्यामुळे संपूर्ण दुर्गाडी किल्ल्यासह परिसराचे नुतनीकरण करून या किल्ल्याला पर्यटनाचे रूप येईल या दृष्टीने दुर्गाडी किल्ल्याचे सौंदर्यीकरण करण्याची मागणी उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हाप्रमुख विजय उर्फ बंड्या साळवी यांनी चार महिन्यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

दुर्गाडी किल्ल्याच्या बुरूजाचे काम सुरू आहे. त्यानंतर मंदिराच्या चौथऱ्याचे काम केले जाणार आहे. अशी तुटक पध्दतीने दुर्गाडी किल्ल्याची देखभाल दुरुस्ती, डागडुजीची कामे न करता संपूर्ण दुर्गाडी किल्ल्याच्या नुतनीकरणाचा एका ज्येष्ठ रचनाकाराकडून आराखडा तयार करण्यात यावा. या आराखड्याच्या माध्यमातून आकर्षक पध्दतीने किल्ल्याची मूळ प्रतिकृती कायम ठेऊन नव्याने उभारणी करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाप्रमुख साळवी यांनी केली आहे.

सद्यस्थितीत दुर्गाडी किल्ल्याच्या प्रवेशद्वार कमानींना तडे गेले आहेत. मंंदिराचा चौथरा पोखरला गेला आहे. चौथऱ्याच्या लाद्या तुटल्या आहेत. चौथऱ्याला तटबंदी नसल्याने तो कोसळण्याच्या स्थितीत आहे. हे विदारक चित्र कोणाही किल्लाप्रेमी नागरिकाला न बघविणारे आहे. त्यामुळे किल्ल्याच्या नुतनीकरणाचे काम प्राधान्याने हाती घ्यावे, अशी मागणी नागरिकांच्यावतीने साळवी यांंनी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१९७४ मध्ये कल्याण नगरपालिकेचे तत्कालीन नगराध्यक्ष दिवंगत ना. का. आहेर यांनी नागरिकांच्या इच्छेचा मान राखून किल्ल्याचे प्रवेशद्वार आणि मंदिराची उभारणी केली. नागरिकांच्या श्रध्देचा विचार करून शासनाने दुर्गाडी किल्ल्याच्या नुतनीकरणाचे काम हाती घ्यावे, अशी मागणी जिल्हाप्रमुख विजय साळवी यांनी केली आहे.