कल्याण : कल्याण डोंंबिवली पालिकेने कचऱ्यावरील वाढीव वापर शुल्क रद्द करावे, या मागणीसाठी उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डोंबिवली जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी दोनशेहून अधिक शिवसैनिकांचा मागील आठवड्यात कल्याण डोंबिवली पालिका मुख्यालयावर मोर्चा काढला होता. मोर्चा काढल्यानंतर पोलिसांनी घालून दिलेल्या अटीशर्तींचे उल्लंघन मोर्चेकरांनी केल्याने पोलिसांनी जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रेंसह महत्वाचे नऊ पदाधिकारी आणि १२५ शिवसैनिकांवर बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
हवालदार विशाल चौधरी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस ठाण्यातील तक्रारीतील माहिती, अशी की कल्याण डोंबिवली पालिकेने कचरा वापर शुल्कात वाढ केली आहे. ही वाढ अन्यायकारक असल्याने ठाकरे गटाचे डोंबिवली जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी गेल्या आठवड्यात पालिकेच्या कल्याणमधील मुख्यालयावर मोर्चा काढला होता. साहाय्यक पोलीस आयुक्तांनी अटीशर्ती घालून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही या अटीवर मोर्चाला परवानगी दिली होती. मोर्चा पालिका मुख्यालयासमोर अडविण्यासाठी पोलिसांनी रस्तारोधक उभे केले होते.
सुमारे २५० शिवसैनिकांचा मोर्चा पालिकेच्या प्रवेशव्दारावर धडकल्यानंतर साहाय्यक पोलीस निरीक्षक तुळशीराम राठोड यांनी मोर्चाच्या शिष्टमंडळाला आयुक्तांंबरोबरच्या चर्चेसाठी जाण्याची सूचना केली. यावेळी कोणतीही घोषणाबाजी करू नये. मनाई आदेश लागू आहे, असे पोलिसांनी शिष्टमंडळाला सांगितले. सूचना करूनही मोर्चेकरांनी पोलिसांचे रोधक भेदुन, पालिकेचे मुख्य प्रवेशद्वारातून प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशव्दारावर जाऊन पालिका, शासनाच्या विरुध्द जोरदार घोषणाबाजी केली. पालिका मुख्य सुरक्षा अधिकारी सुरेश पवार यांना प्रशासकीय इमारतीचे प्रवेशद्वार उघडण्यासाठी मोर्चेकरी आक्रमक झाले.
कचरा शुल्क वाढ रद्द करा, आयुक्त हाय हाय, उध्दव साहेब जिंदाबाद, दरवाढ करणाऱ्या सरकारचा निषेध असो. प्रशासन आम्हाला घाबरते, पोलिसांना पुढे करते, या सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय, अशा घोषणांंनी मुख्यालय परिसर दणाणून सोडला. मोर्चेकरांनी मोर्चाला परवानगी देताना दिलेल्या अटीशर्तींचे उल्लंघन केले. मनाई आदेशाचा भंग केला आणि कायद व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला म्हणून हवालदार चौधरी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली.
ठाकरे गटाचे मोर्चाचे नेतृत्व करणारे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे, उपनेते विजय उर्फ बंड्या साळवी, बाळा परब, साईनाथ तारे, राजेश महाले, धनंजय बोडारे, तात्या माने, प्रकाश तेलगोटे, वैशाली दरेकर, अल्ताफभाई शेख या पदाधिकाऱ्यांसह १२५ शिवसैनिकांवर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र पोलीस अधिनियमाने गुन्हा दाखल केला आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे पालिकेकडे कचरा शुल्क वाढ रद्द करा म्हणून प्रयत्न करत आहेत. प्रशासन त्यास दाद देत नसल्याने अखेर शिवसेनेने मोर्चा काढला होता.