लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : मुंब्रा येथे फळ विक्रेत्याला एका तरुणाने मराठी बोल असे म्हटल्यानंतर तरुणालाच माफी मागायला लावण्यात आली आहे. या प्रकारवरून आता सर्वत्र संताप व्यक्त केला जात असताना मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी एक पोस्ट केली आहे.

डायघर भागात राहणारा २१ वर्षीय मुलगा गुरुवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास मुंब्रा येथील कौसा भागात फळविक्रेत्याकडे फळ खरेदी करण्यासाठी गेला होता. त्यावेळी फळ विक्रेता त्याच्याशी हिंदीत बोलू लागला. त्यामुळे मराठी बोला असे तो तरुण फळ विक्रेत्याला म्हणाला. त्यामुळे फळ विक्रेता आणि तरुणामध्ये वाद झाला. या वादानंतर फळ विक्रेत्याने त्याच्या सहकाऱ्यांना बोलाविले. ते सहकारी आल्यानंतर त्यांनी तरुणाला कान पकडून माफी मागण्यास भाग पाडले. तसेच तो माफी मागत असल्याचे चित्रीकरणही प्रसारित केले. या घटनेनंतर फळ विक्रेता मुंब्रा पोलीस ठाण्यात गेला. तसेच त्या तरुणाविरोधात त्याने तक्रार दाखल केली. मुंब्रा पोलीस ठाण्याबाहेर त्यांनी तरुणा विरोधात घोषणाबाजी केली.

आणखी वाचा-मराठी बोलण्यास सांगितल्याने तरुणाला कान पकडून माफी मागण्यास पाडले भाग

तरुणाविरोधात शिवीगाळ आणि धमकाविल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. चित्रीकरण समाजमाध्यमावर प्रसारित झाल्यानंतर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. मनसचे नेते आणि ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनीही तरुण माफी मागत असल्याचा व्हिडिओ प्रसारित करत प्रतिक्रिया दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाहा काय म्हणाले अविनाश जाधव

‘मराठी बोलणं गुन्हा ठरलाय, मराठीसाठी माफी मागावी लागतीये तेही महाराष्ट्रात! हे आता मुंबई आणि महाराष्ट्रातील प्रत्येक चौकात होणार, आणि मराठी माणूस फक्त पाहत राहील. याच साठी महाराष्ट्राला राज साहेब हवे होते… आता भोगा कर्माची फळ…’ असे त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे.