ठाणे : ठाणे शहरात बुधवारी सकाळी पुन्हा पावसाने हजेरी लावली. अचानक सुरु झालेल्या पावसामुळे घराबाहेर पडलेल्या नोकरदारांची तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी वृक्षाच्या फांद्या कोसळल्या. पावसामुळे रस्ते दुरुस्तीची कामे देखील ठप्प झाली. तसेच नवी मुंबईतही पावसाने हजेरी लावली.
जिल्ह्यात मंगळवारी रात्री काही मिनीटे पडलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. शहापूर भागात शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याचे नुकसान झाले. तर ठाणे, कल्याण शहरातील अनेक भागात वृक्ष कोसळले. त्यानंतर बुधवारी सकाळी पुन्हा पाऊस पडला. सकाळी ११ वाजेपासूनच वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सकाळी कामानिमित्ताने घराबाहेर पडलेल्या नोकरदारांचे हाल झाले. अनेक ठिकाणी वृक्षांच्या फांद्यांची पडझड झाली. शहरातील काही सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली होती. बाजारपेठेत व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. तर खरेदीसाठी गेलेल्या नागरिकांना आडोसा शोधावा लागला.
ठाण्यातील घोडबंदर, मुंबई नाशिक माहमार्गावरील माजिवडा ते साकेत रोड परिसरात वाहतुक कोंडीस सुरुवात झाली होती. त्यामुळे, ठाणे, नवी मुंबईच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या नागरिकांना कोंडीचा सामना करावा लागला. महामार्ग तसेच घोडबंदर परिसरात रस्ता दुरुस्तीची कामे सुरु आहेत. परंतु पावसामुळे कामात अडथळे निर्माण झाले.
धर्मराज्य पक्षाचे महापालिकेस पत्र
धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी महापालिकेस पत्र लिहीले. मंगळवारी रात्री पाऊस पडल्यानंतर, आज सकाळीच सायकलिंग करीत सुखद नैसर्गिक वातावरणाचा आनंद लुटत असताना शहरात अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने दिसले. यावरून अत्यावश्यक व प्राथमिक रस्त्या बांधणी तांत्रिक गुणवत्तापूर्ण नसल्याचेच आढळून आले आहे.
ठाणे शहरात बुधवारी सकाळी पडलेल्या पावसामुळे सॅटिस येथील पादचारी पुलावर पाणी साचले होते. साचलेल्या पाण्यातून ये जा टाळण्यासाठी काहीजण पुलाच्या कठड्या वरून जाताना दिसले. (व्हिडिओ – दीपक जोशी, लोकसत्ता ) pic.twitter.com/OsxsgPqBMd
— LoksattaLive (@LoksattaLive) May 7, 2025
पावसाळ्यापूर्वी कामाची आपण स्वतःहून पाहणी करून खबदारीच्या योग्य सूचना प्रशासनास दिल्याचे वर्तमानपत्रात प्रसिद्ध माध्यमातून समजले. पण प्रत्यक्षात अवकाळी पावसाने पाऊस पडून आठ तास होऊनही पाणी साचलेले यावरून तांत्रिक कामात कमी असून निकृष्टता सिध्द होते असे त्यांनी पत्रात म्हटले.
आम्ही धर्मराज्य पक्षांकडून अपणास विनंती करीत आहोत अवकाळी पावसाचा फायदा घेऊन जेथे जेथे पाणी साचते की ज्यामुळे पावसाळ्यात आरोग्यास हानीकारक अशा बाबतीत योग्य ती खबरदारीचे प्रशासनास सूचना देऊन गुणवत्तापूर्ण ध्येयाकडे वाटचाल करावी. भविष्यात नागरिकांकडून कोणतीही तक्रार येणार नाही. तर झीरो टॉलरन्सकडे वाटचालीचे ध्येय साकार करावे असे पत्रात म्हटले आहे.