ठाणे: ठाणे- नवी मुंबई वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या ठाणे ते वाशी, पनवेल, नेरूळ ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतुक ठप्प झाली आहे. ऐरोली पुलाचे गर्डर तिरके झाल्याने हा परिणाम झाला आहे. ट्रान्स हार्बर मार्गिकेवर रेल्वेगाड्या उपलब्ध नसल्याने सकाळी ठाणे, दिघा, ऐरोली रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी उसळली आहे. नोकरदारांकडून संताप व्यक्त केला जात आहे. अनेकांनी घरचा रस्ता धरला. तर काही प्रवासी ठाण्याहून रस्ते मार्गे नवी मुंबईच्या दिशेने निघाले होते.
नवी मुंबई येथील ऐरोली, रबाळे, घणसोली आणि तुर्भे भागात मोठ्याप्रमाणात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्या आणि कारखाने आहे. त्यामुळे ठाणे ते कर्जत, कसारा आणि मुलुंड, भांडूप, मुंबई उपनगरातील लाखो प्रवासी दररोज ठाणे रेल्वे स्थानकातून ट्रान्स हार्बर मार्गे नवी मुंबईत जात असतात. ट्रान्स हार्बर मार्गावर २५० हून अधिक रेल्वेगाड्यांच्या फेऱ्या नेरूळ, वाशी आणि पनवेलच्या दिशेने होतात. ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक नऊ आणि ‘१० आणि १० अ’ या फलाटांवर रेल्वेगाड्या थांबविल्या जातात.
पहाटे ट्रान्स हार्बर मार्गावर ‘एमएमआरडीए’ने ठाणे आणि ऐरोली दरम्यान गर्डर बसविण्यासाठी ट्रान्स हार्बर मार्गावर मध्यरात्री १ ते पहाटे ४ या वेळेत ब्लॉक घेतला होता. हे गर्डर तिरके झाल्याचे लक्षात आल्यानंतर ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतुक सकाळी ७.१० वाजल्यापासून रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली आहे.रेल्वे वाहतुक थांबविल्याने त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात झाला.
ठाणे, दिघा, ऐरोली स्थानकात प्रवाशांची गर्दी उसळली होती. रेल्वे वाहतुक बंद असल्याने अनेकांनी ठाणे रेल्वे स्थानकाबाहेरील सिडको बसगाड्यांच्या थांब्यावरून नवी मुंबईत प्रवास करण्याचा निर्णय घेतला. परंतु बसगाड्या देखील वेळेत उपलब्ध होत नव्हत्या. रिक्षा चालक देखील येण्यास टाळाटाळ करत होते. त्यामुळे प्रवाशांचा संताप अनावर झाला होता. काही प्रवाशांनी नाइलाजाने ओला, उबर, रॅपिडोचा मार्ग निवडला. ठाणे रेल्वे स्थानकात एक रेल्वेगाडी सकाळपासून उभी होती. ही रेल्वेगाडी काही वेळात सुरु होईल या आशेने काही प्रवासी त्या रेल्वेगाडीतच बसून होते.