मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी घेतली. पण पदवी मिळवण्याची प्रक्रिया योग्य नसल्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदवी अभ्यास क्रमातून एका विद्यार्थिनीला नुकताच प्रवेश नाकारण्यात आला. त्या विद्यार्थिनीचे वर्ष वाया गेले. त्यातल्या त्यात दिलासा एवढाच की, विद्यापीठाच्या विद्यार्थी तक्रार निवारण विभागाने तिचे आर्थिक नुकसान होणार नाही याची खबरदारी मात्र घेतली.
बारावी झाल्यावर परदेशी विद्यापीठांच्य प्रलोभनांना बळी पडून एका विद्यार्थिनीने हॉटेल मॅनेजमेंटच्या पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. यानंतर तिला एमबीए करायचे असल्यामुळे तिने ‘यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठा’तून पदवी घेतली. तिने पदविका शिक्षण पूर्ण केले होते म्हणून तिला मुक्त विद्यापीठाच्या नियमांनुसार पदवीच्या शेवटच्या वर्षांला प्रवेश मिळाला. यानंतर तिने या पदवीच्या आधारे मुंबई विद्यापीठाच्या जमनालाल बजाज व्यवस्थापन शिक्षण संस्थेत पदव्युत्तर पदवीसाठी प्रवेश घेतला. हा प्रवेश घेतल्यानंतर नोकरी सोडून ती नियमित महाविद्यालयात जाऊ लागली. यानंतर सहा महिन्यांनी तिची पदवी या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ग्रा’ा नसल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले. यामुळे या विद्यार्थिनीचे शैक्षणिक नुकसान झालेच; शिवाय तिची नोकरीही गेली.
या पाश्र्वभूमीवर विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये, असे आवाहन सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी केले आहे. एप्रिल मे महिना आला की विद्यार्थ्यांना विविध प्रलोभने दाखवत विद्यापीठे आकर्षित करीत असतात. ‘एका वर्षांत पदवी मिळवा’, असे आश्वासन दिले जाते. अनेक विद्यापीठांना विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता असते. पण पदवी अभ्यासक्रमाची त्यांची प्रक्रिया तीन वर्षांची नसते. तीन किंवा चार वष्रे शिक्षण घेऊन मिळवलेली असेल तरच ती पदवी मुंबई विद्यापीठातील पदव्युत्तर पदवी शिक्षणासाठी ग्राह्य धरली जाते असेही सावंत यांनी स्पष्ट केले.
विद्यापीठातील पात्रता विभागाकडून खालील विद्यापीठांच्या काही पदव्या ग्राह्य धरल्या जात नाहीत.
१. अन्नामलाई विद्यापीठ    
२. मदुराई कामराज विद्यापीठ    
३. मनोनामानियम सुंदरन विद्यापीठ    
४. मदारार विद्यापीठ    
५. ग्लोबल ओपन विद्यापीठ
६. ओमानिया विद्यापीठ
७. महात्मा गांधी विद्यापीठ
८. काकतीय विद्यापीठ.