Coronavirus lockdown : करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. करोनाचा फटका क्रीडा विश्वालाही बसला असून बहुतांश क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. लवकरात लवकर क्रीडा स्पर्धा सुरू व्हाव्यात आणि नवोदित खेळाडूंना संधी मिळावी, अशी भावना सर्व क्रीडापटूंच्या मनात आहे. भारतीय खेळाडूंसोबतच परदेशी खेळाडू हळूहळू IPL च्या आयोजनाचा आग्रह धरताना दिसत आहेत, पण अद्याप करोनाचा फैलाव आणि प्रार्दुभाव कमी होण्याचे चिन्ह नाही. त्यामुळे यंदाचे IPL रद्द होण्याच्या मार्गावर आहे. अशातच १९८३ च्या विश्वविजेत्या भारतीय संघातील खेळाडू मदन लाल यांनी मत व्यक्त केले आहे.

“IPL हा एक मोठा ब्रँड आहे. पण करोनाचा धोका टळला आणि परिस्थिती सुधारली की त्यानंतरच IPL ची गव्हर्निंग परिषद स्पर्धेच्या आयोजनाबाबत निर्णय घेऊ शकते. सध्याच्या स्थितीत IPL चे आयोजन करण्याचा काहीच पर्याय उपलब्ध नाही. सध्या कोणीही जोखीम उचलण्याचा प्रयत्न करणार नाही. प्रेक्षक नसलेल्या मैदानांवर IPL चे सामने खेळवण्यात काहीच अर्थ नाही. कारण, IPL हे केवळ चाहते आणि खेळाडूंपर्यंतच मर्यादित नाही. त्यात दळणवळणाची व्यवस्था करणारे, आयोजनाची जबाबदारी करणारे आणि प्रसारणाचे हक्क असलेल्यांचाही समावेश आहे,” असे मदन लाल म्हणाले.

मदन लाल

 

IPL रद्द झाल्यास ३८०० कोटींचा फटका

२०१८ साली स्टार इंडियाने भारतीय संघाच्या क्रिकेट सामन्याच्या प्रसारणाचे हक्क पुढील पाच वर्षांसाठी ६,१३८.१ कोटी रूपयांना विकत घेतले. पण स्टार इंडियाचे हे हक्क केवळ भारतीय क्रिकेट संघाच्या मायदेशातील क्रिकेट मालिका आणि इतर देशांतर्गत स्पर्धांसाठीच मर्यादित आहेत. २०१७ साली स्टार इंडियाने IPL च्या टीव्ही आणि डिजीटल प्रसारणाचे जगभरातील हक्क विकत घेतले. तब्बल १६,३४७.५० कोटींना हे हक्क विकत घेण्यात आले. २०१८ ते २०२२ या कालावधीसाठी हा व्यवहार झाला. त्यामुळे IPL रद्द झाल्यास स्टार इंडियाला थेट ३२६९.५० कोटींचा फटका बसू शकतो.

BCCI ने IPL च्या मुख्य प्रायोजकत्वासाठी VIVO कंपनीशीदेखील करार केला आहे. ‘विवो’ने ५ वर्षांसाठी २,००० कोटींना IPL चे मुख्य प्रायोजकत्व घेतले आहे. त्यामुळे ‘विवो’लादेखील थेट ४०० कोटींचा फटका बसू शकतो. त्यात भर म्हणून इतर प्रायोजकत्वाची रक्कमदेखील अंदाजे २०० कोटींच्या आसपास आहे. त्यामुळे IPL रद्द झाल्यास एकूण ३,८६९ कोटींचा फटका BCCI आणि इतर समभागधारकांना बसण्याची शक्यता आहे. याशिवाय करोनासंदर्भात BCCI ने कोणताही विमा उतरवला नसल्याने IPL रद्द झाल्यास काहीही नुकसान भरपाईही मिळणार नाही.