कोकणातील प्रश्न तसेच येथील शेतकऱ्यांचे प्रश्न मांडून ते सोडविण्यासाठी पत्रकारांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे, तसेच आपल्या भागाचा विकास होण्यासाठी विकासात्मक दृष्टिकोन ठेवून पत्रकारांनी नेहमी विकासाबरोबर राहिले पाहिजे, असे मत आमदार सुभाष पाटील यांनी आज येथे व्यक्त केले.

रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने ना.ना.पाटील सभागृह येथे आयोजित पत्रकार दिन कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार व दैनिक मुंबई मित्रचे संपादक अभिजीत राणे, दैनिक पुढारीचे रायगड आवृत्तीचे संपादक शशिकांत सावंत, कोकण विभाग अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष मििलद आष्टीवकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कोकण भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न वेगळे आहेत, हे प्रश्न मांडून शासनाचे लक्ष वेधून कोकणाला न्याय मिळविणे आवश्यक आहे. पत्रकारांनी आपल्या भागाच्या विकासासाठी शासकीय निधी मिळाला पाहिजे यासाठी वस्तुनिष्ठ बातम्या देऊन आवाज उठविला पाहिजे. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी असणारी उत्पन्न मर्यादा वाढविणे आवश्यक आहे, समाजाचे प्रश्न मांडत असताना पत्रकारांच्या स्वत:च्या अडचणी, प्रश्न दुर्लक्षित होतात. ते सोडविण्यासाठी पत्रकारांनी एकजुटीने प्रयत्न करावेत असेही पाटील यांनी सांगितले.  याप्रसंगी रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने दिले जाणारे पुरस्कार वितरित करण्यात आले. राजा राजवाडे स्मृती पुरस्कार डॉ. पूर्वा प्रमोद अष्टपुत्रे (अंबरनाथ-ठाणे), कै. र.वा.दिघे पुरस्कार – सिद्धार्थ नवीन सोष्टे (नागोठणे), रायगड पत्रभूषण पुरस्कार दामोदर शहासने (कर्जत), स्व.म.ना.पाटील स्मृती पुरस्कार गुरुनाथ साठीलकर (खोपोली), रामनारायण युवा पत्रकार पुरस्कार-जितेंद्र जोशी (रोहा), संतोष चौकर (श्रीवर्धन), उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार जुगल दवे (रोहा) यांना प्रदान करण्यात आले.

पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील पत्रकार, छायाचित्रकार मोठय़ा संख्येने उपस्थित होते.