अहिल्यानगर : जिल्ह्यातील साखर व दुग्धजन्य पदार्थ, तसेच अन्य मालाची निर्यात वाढवण्यासाठी निर्यातदारांना प्रशिक्षण देण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचा आदेश जिल्हाधिकारी डाॅ. पंकज आशिया यांनी जिल्हा उद्योग केंद्राच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.

जिल्हा उद्योगमित्र समितीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश दिला. बैठकीस उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक दीपक शिवदास, एमआयडीसीचे विभागीय अधिकारी गणेश राठोड, उद्योग अधिकारी श्याम बेनके, श्याम बिराजदार, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चरचे प्रकाश गांधी, जागतिक बँक प्रकल्पाचे उपकार्यकारी अभियंता अभय भांगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता यू. ए. बोरुडे, उत्पादनशुल्क विभागाचे प्रवीणकुमार तेली, उद्योजकांचे प्रतिनिधी हारजितसिंग वाधवा, उद्योजकांच्या ‘आमी’ संघटनेचे अध्यक्ष जयद्रथ खाकाळ व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

एक जिल्हा एक उत्पादन या योजनेत जिल्ह्यातील साखर व दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यातील उत्पादनांची निर्यातक्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत. त्यासाठी फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना विदेश व्यापार महानिदेशनालयामार्फत प्रशिक्षण देण्यात यावे. निर्यातीतील अडचणी सोडवण्यासाठी निर्यात मदत केंद्र उभारण्याचीही सूचना त्यांनी केली.

बैठकीत औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांची कामे, अनधिकृत स्टॉल हटवणे, पोलीस गस्त वाढवणे, अखंड व पुरेसा विद्युतपुरवठा, सन फार्मा ते निंबळक रस्त्याचे काम, गटारींची व्यवस्था, कामगारांसाठी आयुष्यमान भारत योजनेंतर्गत आरोग्य सेवा, नवीन वीज उपकेंद्राची उभारणी, पथदिवे, भूखंडवाटप, निवासी क्षेत्रविकास, अग्निशामक यंत्रणा, राष्ट्रीयीकृत बँकेची भरती आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वीज व जागेच्या प्रश्नाने उद्योजक त्रस्त

एमआयडीसीतील उद्योजक पुरेशा वीजपुरवठ्याअभावी हैराण झालेले आहेत. बैठकीत याकडे लक्ष वेधण्यात आले. यासाठी स्वतंत्र बैठक आयोजित करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केले. जागा उपलब्ध नसल्याने सहा हजार कोटी गुंतवणुकीचा प्रकल्प नगरमधून बाहेर न्यावा लागल्याचा अनुभव बैठक संपल्यानंतर एका कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितला. या कंपनीने ७० एकर जागेची मागणी केली होती.