संगमनेर : संगमनेर नगरपालिकेत अनेक वर्षांपासून कचरा व्यवस्थापन, गटार स्वच्छता आणि रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम करणाऱ्या ठेकेदारांनी चुकीची कामे केली आहेत. त्यांची चौकशी करून दोषी ठेकेदारांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश आमदार अमोल खताळ यांनी मुख्याधिकारी रामदास कोकरे यांना दिले.

शहरातील दिल्ली नाका येथे नागरी दलितेतर वस्ती सुधार योजनेअंतर्गत भूमिगत गटार काँक्रिटीकरण सुधारणा तसेच सेवा रस्ता तयार करण्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार खताळ यांच्या हस्ते आज, रविवारी सकाळी करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. माजी उपनगराध्यक्ष जावेद जहागीरदार, माजी नगरसेवक ॲड. श्रीराम गणपुले, ज्ञानेश्वर कर्पे, शिरीष मुळे, शिवसेनेचे शहरप्रमुख दिनेश फटांगरे, विनोद सूर्यवंशी, तालुकाप्रमुख रामभाऊ राहणे, आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास कासार, भाजपचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ गुंजाळ, रोहित चौधरी, वरद बागुल, ऋषिकेश मुळे, सौरभ देशमुख, राहुल भोईर, गोकुळ दिघे, नासिर शेख, बबलू काझी, मजहर शेख, मुझफ्फर जहागीरदार, कांचन ढोरे, मेघा भगत, रेश्मा खांडरे, उषा कपिले, मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार खताळ म्हणाले की, गेल्या ३० वर्षांपासून नगरपालिकेवर सत्ता असणाऱ्यांनी विविध कामांचे ठेके आपल्या मर्जीतील ठेकेदारांना दिले. कामांच्या दर्जाकडे कधीही लक्ष दिले गेले नाही. पालिकेत त्यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. या सगळ्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बैठक घेऊन भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई करण्यास भाग पाडू.

दिल्ली नाका परिसरात होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सेवा रस्ता होणे गरजेचे आहे, असा आग्रह आपण पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे धरला होता. त्यांनी तत्काळ नागरी दलितेतर वस्ती सुधार योजनेतून एक कोटी ५१ लाख ६९ हजार रुपये मंजूर केले. या निधीतून कामाची सुरुवात करण्यात आली आहे. ठेकेदाराने हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. न खाऊंगा, ना खाने दूंगा ही भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली, तीच भूमिका आपण संगमनेर येथील विकासकामांबाबत घेत आहोत. त्यामुळे वेळेत काम करतानाच या कामांचा दर्जा उत्तम राहील याकडे नगरपालिका प्रशासनाने लक्ष द्यावे.

मला माझ्या कुटुंबातील कुणाला राजकारणात आणायचे नाही. मला फक्त लोकांचे प्रेम आणि विश्वास हवा आहे. त्यामुळे विकासकामे चांगल्या दर्जाची झाली पाहिजे, असे त्यांनी बजावले. यावेळी जहागीरदार, मुळे, मजहर शेख यांचीही भाषणे झाली. पालिकेचे मुख्याधिकारी कोकरे यांनी प्रास्ताविक केले. आभार नगर अभियंता प्रशांत जुन्नरे यांनी मानले. सूत्रसंचालन अजित जाधव यांनी केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संगमनेर शहरात ‘एसटीपी’ प्रकल्प उभा करण्याचा काहींनी घाट घातला आहे. मात्र, तो प्रकल्प इतरत्र हलविण्यासाठी मी तुमच्याबरोबर राहील. केंद्रात आणि राज्यात महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे निधी आणण्यासाठी आणि विकासाचा वेग साधण्यासाठी आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विकासाभिमुख उमेदवार निवडून द्यावेत. – आमदार अमोल खताळ.