दिवंगत अभिनेते ए.के. हंगल यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक दशकं काम केलं होतं. त्यांचं पूर्ण नाव अवतार किशन हंगल. ते ‘शोले’ आणि ‘दीवार’ सारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका साकारून लोकप्रिय झाले. हंगल यांचा जन्म भारत-पाकिस्तान फाळणीपूर्वी झाला होता, फाळणीनंतर ते पाकिस्तानला गेले. हंगल कम्युनिस्ट विचारांचे होते, त्यामुळे कराचीमध्ये तुरुंगवास झाला आणि ते भारतात आले. पण भारतात पाकिस्तानी लोकांशी संबंध असल्याने शिवसेनेने त्यांच्यावर ‘बंदी’ घातली होती. तत्कालीन राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी हंगल यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलं होतं. ए.के हंगल यांना शेवटच्या काळात आर्थिक अडचणीचा सामना करावा लागला होता. अनेक वर्षे इंडस्ट्रीत काम करूनही त्यांच्या अंत्यसंस्काराकडे बॉलीवूड कलाकारांनी पाठ फिरवली होती. याच ए.के. हंगल यांच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊयात.

१९९७ मध्ये रेडिफला दिलेल्या मुलाखतीत हंगल यांनी त्यांच्या तरुणपणाबद्दल सांगितलं होतं. “फाळणीनंतर मी पाकिस्तानातच राहिलो पण कम्युनिस्ट विचारसरणीमुळे मला अटक करण्यात आली. मी दोन वर्षे तुरुंगात घालवली. मला तिथे खूप मारहाण व्हायची, कारण मी वाईट जेवण आणि वाईट सुविधांचा विरोध करत होतो. शेवटी मला पाकिस्तान सोडून भारतात जाण्यास सांगण्यात आलं. पण मी जिथे जन्मलो ते ठिकाण आणि संस्कृती कशी सोडून जाऊ शकतो? एके दिवशी, माझ्या पक्षातील ज्येष्ठ मुस्लीम नेत्यांनी मला भारतात जाऊन तिथे पक्षाचे काम सुरू कर असं सांगितलं, कारण मी त्यांच्यात एकमेव हिंदू होतो. मला पाकिस्तान सोडण्यासाठी १२ तासांचा वेळ देण्यात आला होता,” असं हंगल म्हणाले होते.

ए.के हंगल यांना मिळायचा ५०० रुपये पगार

“मला माझ्या बहिणीकडे नवी दिल्लीला जायचं होतं, पण माझ्याकडे पैसे नव्हते. मी खिशात २० रुपये घेऊन मुंबईत आलो. तेव्हा मी २१ वर्षांचा होतो. कराचीतील काही मित्रांना मी भेटलो आणि त्यांनी माझ्या कुटुंबाची काळजी घ्यायची तयारी दर्शवली. नंतर मला इथे टेलर म्हणून नोकरी मिळाली आणि मला दरमहा ५०० रुपये पगार मिळायचा. १९४९ च्या त्या काळात, ही रक्कम खूप मोठी होती. माझ्याकडे पतौडीचे नवाब आणि ब्रिटिशांसारखे श्रीमंत ग्राहक होते. मला नेहमीच प्रेझेंटेबल दिसायला आवडायचं, त्यामुळे मी कामावर नेहमी सूट घालत असे,” असं हंगल म्हणाले होते.

हंगल यांचे चित्रपट

यानंतरच हंगल यांचं अभिनेता म्हणून करिअर सुरू झालं. त्यांनी ‘अभिमान’, ‘अनुभव’, ‘दीवार’, ‘शोले’, ‘आंधी’, ‘नमक हराम’, ‘आप की कसम’, ‘शागिर्द’, ‘मेरे अपने’, ‘परिचय’, ‘दाग’, ‘जोशीला’, ‘हीरा पन्ना’, ‘जवानी दिवानी’, ‘गरम हवा’, ‘बावर्ची’, ‘कोरा कागज’, ‘चित चोरम’, सत्यम शिवम सुंदरम सारखे चित्रपट केले. ‘लगान’ आणि ‘पहेली’ या चित्रपटांमध्ये त्यांनी सर्वात लक्षवेधी भूमिका केल्या. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये जवळपास ३०० चित्रपट केले.

ak hangal jaya bachchan
अनामिका चित्रपटात ए.के हंगल व जया बच्चन (फोटो – एक्सप्रेस आर्काइव्ह)

शिवसेनेने घातली होती बंदी

१९९३ मध्ये, पाकिस्तानी नागरिकांशी संवाद साधल्याबद्दल आणि व्हिसा मागितल्याबद्दल शिवसेनेने हंगल यांच्यावर बंदी घातली होती. “मला पाकिस्तानला जायचं होतं आणि माझ्या आठवणींसाठी काही वस्तू गोळा करायच्या होत्या. तो गुन्हा होता का?” असं ते मुलाखतीत म्हणाले होते. “मी एक वर्ष मानसिक आणि आर्थिक त्रास सहन केला,” असं त्यांनी सांगितलं होतं.

AK hangal apj abdul kalam
ए.के. हंगल यांना सन्मानित करताना एपीजे अब्दुल कलाम (फोटो – एक्सप्रेस आर्काइव्ह)

या काळात चित्रपटसृष्टीतील कोणतीच व्यक्ती हंगल यांना पाठिंबा देण्यासाठी उभी राहिली नाही, पण त्यावर काहीच हरकत नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. “मी फक्त एक कॅरेक्टर अभिनेता होतो. चित्रपटसृष्टी माझ्याकडे दुर्लक्ष करू शकते. मी नसल्याने काही आर्थिक फटका बसणार नव्हता. पण केरळमध्ये थिएटर करणाऱ्या लोकांनी मला पाठिंबा देणाऱ्या काही सुंदर कविता मला पाठवल्या,” असं हंगल म्हणाले होते.

आर्थिक संकट

जवळपास एक दशक आणि त्याहूनही जास्त काळ हंगल यांना उदरनिर्वाहासाठी संघर्ष करावा लागला होता. त्यावेळी त्यांच्या मुलाने इंडस्ट्रीत मदत मागितली होती. “या इंडस्ट्रीतील अनेकांनी आर्थिक संकटातून जात असताना आम्हाला मदत केली. मला वाटतं की त्यांनी कधीही पैशांची बचत केली नाही आणि मेडिक्लेम सुविधांमध्ये गुंतवणूक केली नाही आणि म्हणूनच त्यांना आर्थिक संकटातून जावं लागलं,” असं विजय हंगल म्हणाले होते.

“माझ्या वडिलांबरोबर ज्यांनी काम केलं होतं, ते लोक जसे की अमिताभ बच्चन आणि करण जोहर यांना आमच्या परिस्थितीत समजलं तेव्हा त्यांनी आर्थिक मदत केली,” असं विजय हंगल यांनी सीएनएन-आयबीएनला सांगितलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ए.के. हंगल यांचे निधन २६ ऑगस्ट २०१२ रोजी झालं. ते ९८ वर्षांचे होते. विजय हंगल यांनी वडिलांच्या अंत्यसंस्काराबद्दल माहिती दिली होती. “शेवटचा दिवस त्यांच्यासाठी खूप कठीण होता. बॉलीवूडमधील लोक अंत्यसंस्काराला आले नाहीत याबद्दल मला वाईट वाटत नाही, कदाचित त्यांच्या स्वतःच्या समस्या असतील आणि आता या सर्व गोष्टींबद्दल बोलण्यात काहीच अर्थ नाही,” असं विजय हंगल म्हणाले होते.