Shashank Ketkar : IPL २०२५ च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जवर ६ रन्सनी मात करत यंदाचं विजेतेपद पटकावलं आहे. तब्बल १७ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कोहलीची आरसीबी टीम आयपीएलची चॅम्पियन ठरली आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाबसमोर १९१ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र, कृणाल पंड्याच्या जबरदस्त गोलंदाजीने संपूर्ण बाजी पालटली आणि आरसीबीने पहिलं विजेतेपद पटकावलं.
आयपीएलच्या विजेतेपदावर नाव कोरल्यावर विराट कोहलीला मैदानातच अश्रू अनावर झाले होते. संपूर्ण टीम यादरम्यान भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने देखील हा विजय विराट कोहली व आमच्या टीमच्या लाखो चाहत्यांचा आहे असं सांगितलं. सध्या सर्व स्तरांतून या टीमचं कौतुक करण्यात येत आहे.
RCB च्या विजयानंतर विराट कोहलीसाठी अनेक बॉलीवूडसह मराठी कलाकारांनी पोस्ट शेअर केल्या आहेत. मात्र, या सगळ्यात मराठी अभिनेता शशांक केतकरने शेअर केलेल्या मजेशीर पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. बंगळुरू संघाचे माजी मालक विजय मल्ल्या होते. त्यामुळे शशांकने RCB जिंकल्यावर, “आता तरी यांच्या मालकाला भारतात बोलवा” अशी पोस्ट शेअर केली आहे.
यावर नेटकऱ्यांनी देखील भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. “आता यावच लागतंय”, “तो परत येऊन कर्ज फेडणार आहे म्हणे”, “गूडवन शशांक”, “रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे माजी मालक विजय मल्ल्या आहेत… आरसीबी आता पूर्णपणे युनायटेड स्पिरिट्सच्या मालकीची आहे.” अशा कमेंट्स युजर्सनी शशांकच्या पोस्टवर केल्या आहेत. याशिवाय अभिनेता पार्थ भालेरावने देखील आरसीबीच्या विजयानंतर विजय मल्ल्या यांच्याबद्दलची पोस्ट शेअर करत त्यांच्या मायदेशी परत येण्याविषयी भाष्य केलं आहे.
दरम्यान, आरसीबी जिंकल्यावर स्वत: विजय मल्ल्या यांनीही एक्स पोस्ट शेअर केली आहे. “१८ वर्षांनी अखेर आरसीबीने आयपीएलचे विजेतेपद पटकावले. २०२५ च्या स्पर्धेत संघाने उत्कृष्ट कामगिरी केली. मनापासून अभिनंदन! ई साला कप नाम दे!!”, असं माल्या यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे.