‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ मालिकेने लोकप्रियतेचं एक वेगळं शिखर गाठलं आहे. ‘ठरलं तर मग’ मालिकेवर पहिल्या दिवसापासून प्रेक्षक वर्ग भरभरून प्रेम करत आहेत. त्यामुळे मालिका टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानावर टिकून आहे. मालिकेतील प्रत्येक कलाकाराने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सायली-अर्जुनच्या जोडीला प्रेक्षकांचं विशेष प्रेम मिळत आहे. अशातच अर्जुन म्हणजेच अभिनेता अमित भानुशालीने इन्स्टाग्रामवर काही स्टोरी शेअर केल्या आहेत; ज्या चांगल्याच चर्चेत आल्या आहेत.

अभिनेता अमित भानुशालीने नुकतीच ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेतील कलाकारांची भेट घेतली. या भेटीचे फोटो अमितने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. “खूप गोड आणि सुंदर कुटुंब, ‘तुझेच मी गीत गात आहे’ टीम”, असं लिहित अभिनेत्याने फोटो शेअर केला आहे.

हेही वाचा – Video: ‘या’ मराठी अभिनेत्रीमुळे शशांक केतकरने घेतला लाइव्ह क्रिकेट मॅचचा आनंद, व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

तसंच ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेतील मोनिका म्हणजे अभिनेत्री तेजस्विनी लोणारीला अमित करीना कपूर म्हणाला. तिच्याबरोबरचा फोटो शेअर करत त्याने लिहिलं, “क्यूट करीना. असे हृदयस्पर्शी हास्य असणारी व्यक्ती तुम्हाला भेटणं हे नेहमीच आनंददायी असतं.”

अमितची ही स्टोरी रिपोस्ट करून तेजस्विनी त्याला हृतिक म्हणाली. “आमचा हँडसम बॉय अमित भानुशाली. हृतिक.” अमित आणि तेजस्विनीच्या या इन्स्टा स्टोरीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा – Video: माधुरी दीक्षितच्या कोळी लूकमध्ये दिसली अंकिता लोखंडे; व्हिडीओ पाहून कोणी उडवली खिल्ली, तर कोणी केलं कौतुक

दरम्यान, गेल्या आठवड्यात अमित एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळाला. ‘मी होणार सुपरस्टार-जोडी नंबर १’ कार्यक्रमात अभिनेत्री समृद्धी केळकरबरोबर अमित सूत्रसंचालन करताना दिसला. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.

‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या काय सुरू आहे?

अमित भानुशाली व जुई गडकरीची प्रमुख भूमिका असलेल्या ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या अर्जुन-सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य सुभेदार कुटुंबासमोर उघड झाल्याचा सीक्वेन्स सुरू आहे. प्रिया अर्जुन-सायलीचा बदला घेण्यासाठी त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य पूर्णा आजीला सांगते. हे ऐकून पूर्णा आजीला मोठा आश्चर्याचा धक्का बसतो आणि ती सायलीवर भडकते. पूर्णा आजी सायलीला देवीआईसमोर शपथ घ्यायला लावते. “तुझं अर्जुनवर प्रेम आहे का? आणि तुमचं लग्न खरंय का?” या दोन्ही प्रश्नांची उत्तर सायलीने होकारार्थी दिल्याने पुन्हा एकदा प्रियाचा मोठा डाव फसतो. अशातच आता लवकरच मालिकेत कुसुम ताईचं पुनरागमन होणार आहे.