Zee Marathi Kamali : ‘झी मराठी’ वाहिनीवर येत्या ३० जूनपासून ‘कमळी’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत अभिनेत्री विजया बाबर प्रमुख भूमिका साकारणार आहे. खेडेगावातील ‘कमळी’ अभ्यासात प्रचंड हुशार असते, उच्च शिक्षण घेण्यासाठी तिने आता शहरातील कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आहे. पण, ‘कमळी’चा भूतकाळ वेगळाच असतो. हा संपूर्ण प्रवास प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळणार आहे.
अलीकडच्या काळात खेडेगावातील प्रत्येक मुलगी उच्च शिक्षणाचं स्वप्नं पाहतेय. हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी गरज असते ती संधीची आणि प्रोत्साहनाची… हीच महत्त्वाची गोष्ट लक्षात घेऊन ‘कमळी’ मालिकेच्या टीमने एक स्तुत्य पाऊल उचललं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ‘कुरुंदवाड’ मधील शाळेत जाऊन ‘कमळी’च्या टीमने १०० मुलींना सायकल वाटप केलं. या मुली दररोज शाळेत ८ ते १० किमी प्रवास करून शाळेत येतात. त्यांना शाळेत पोहोचण्यासाठी सार्वजनिक वाहतूक म्हणजे एसटी बसचा एकमेव आधार, पण त्याही फेऱ्या मर्यादित. त्यामुळे शाळेत वेळेवर पोहोचणं, परत येणं हे या मुलींसाठी एक आव्हान असतं. यामुळेच या मुलींना ‘कमळी’ने सायकल भेट म्हणून दिल्या. या स्तुत्य उपक्रमाबद्दल सर्वांनी मालिकेच्या टीमचं कौतुक केलं आहे.
अभिनेत्री विजया बाबर म्हणजे आपल्या सर्वांची ‘कमळी’ याबद्दल म्हणते, “या मुलींच्या डोळ्यांत शिक्षणाचं स्वप्न पाहिलं, आणि त्या स्वप्नपूर्तीमध्ये आपला खारीचा वाटा असणार आहे याचं सुख मला मिळालं. सायकल ही फक्त एक वाहन नाही, ती त्या मुलींच्या शिक्षणाच्या प्रवासाची सुरुवात आहे.”
डोळ्यात नकळत पाणी आलं- विजया बाबर
विजया पुढे म्हणाली, “सायकल हातात घेतल्यावर त्या शाळकरी मुलींच्या चेहऱ्यावर जे हास्य उमटलं, ते पाहून डोळ्यांत नकळत पाणी आलं. एक साधी सायकल त्यांच्यासाठी किती मोठा आधार ठरू शकते, हे प्रत्यक्ष अनुभवलं. शाळेपर्यंतचा रस्ता आता त्यांच्यासाठी अडथळा न राहता संधीचा मार्ग बनतो आहे, हे पाहून खूप समाधान वाटतं. शिक्षण हे प्रत्येकाचं हक्काचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नाला गती देणं हीच कमळीची भूमिका आहे.”

“या उपक्रमामागे असलेली भावना ही केवळ एकतर्फी मदत नव्हे, तर शिक्षणाची खरी गरज आणि त्यामागचं स्वप्न ओळखणारी आहे. कारण, कमळी स्वतः शिकून इथपर्यंत आली आहे आणि शिक्षणामुळे तिचं आयुष्य घडत आहे. म्हणूनच ती स्वतःच्या गावात एक महाविद्यालय सुरू करण्याचं स्वप्न बाळगते, जिथे तिच्यासारख्या शिक्षणाची जिद्द असणाऱ्या अनेक मुलींना शिक्षण घेऊन त्यांचं स्वप्न साकार करता येईल. कमळीचा हा प्रवास आणि तिचं कर्तृत्व हे केवळ कौतुकास्पद नाही, तर प्रेरणादायी देखील आहे. जिथे परिस्थितीचा डोंगर वाटेवर असतो, तिथे अशी एखादी साथ मिळाली, की मुलींची पावलं शिक्षणाच्या दिशेने झपाट्याने चालू लागतात.” असं विजया बाबरने सांगितलं. दरम्यान, ही नवीन मालिका ३० जूनपासून रात्री ९ वाजता प्रसारित केली जाणार आहे.