मुंबई – देवनार कचराभूमीवरी अनेक वर्षांपासूनचे कचऱ्याचे डोंगर साफ करण्यासाठी मुंबई महापालिकेने मागवलेल्या निविदा भरण्यासाठी तब्बल तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली असून ४ जुलैपर्यंत निविदाकारांना निविदा भरता येणार आहेत. ८ जुलै रोजी वित्तीय लिफाफा उघडल्यानंतर या कामासाठी कंत्राटदार निश्चितीची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. दरम्यान, पूर्व बोली बैठकीत या कामासाठी २१ कंपन्यांनी रस दाखवला होता.
देवनार कचराभूमीची जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देण्याकरीता या जागेवरील अनेक वर्षांपासूनचे कचऱ्याचे डोंगर हटवून जमीन रिकामी करण्याचे आदेश राज्य सरकारने मुंबई महापालिकेला दिल्यानंतर हा जुना कचरा हटवण्यासाठी मुंबई महापालिकेने मे महिन्यात निविदा मागवल्या होत्या. या कचराभूमीवर एकूण १८५ लाख मेट्रीक टन कचऱ्याचे तब्बल ४० मीटर उंचीचे डोंगर असून हा कचरा हटवण्यासाठी सुमारे २३६८ कोटींचा खर्च अंदाजित आहे. तसेच या कामासाठी किमान तीन वर्षे लागणार आहेत. निविदा भरण्यासाठी आधी ३ जूनपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र त्यानंतर तीनवेळा मुदतवाढ देण्यात आली असून आता ४ जुलैला अंतिम मुदत संपणार आहे.
दरम्यान, निविदा भरण्यापूर्वीची पूर्व बोली बैठक मे महिन्याच्या अखेरीस पालिका मुख्यालयात पार पडली होती. त्यावेळी या बैठकीला २१ विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. परंतु, प्रत्यक्षात त्यापैकी किती निविदाकार निविदा भरतात ते ८ जुलै रोजी समजू शकणार आहे. निविदा भरण्यासाठी व कागदपत्रे जमवण्यासाठी इच्छुक निविदाकारांनी वेळ वाढवून मागितल्यामुळे निविदेची मुदत वाढवण्यात आल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी परिसराच्या पुनर्विकास प्रकल्पासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने संपूर्ण मुंबईतील विविध ठिकाणच्या जागांची मागणी केली आहे. या प्रकल्पातील अपात्र रहिवाशांना सामावून घेण्यासाठी मुंबईत विविध ठिकाणची जमीन सरकार ताब्यात घेत आहे. देवनार कचराभूमीची १२४.३ एकर जागाही या प्रकल्पासाठी देण्याचा निर्णय सहा महिन्यांपूर्वी झाला आहे.
मात्र देवनार कचराभूमीवर गेल्या सुमारे शंभर वर्षांपासून जुना कचरा साठला आहे. या कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करून ही जमीन रिकामी करून देण्याची मागणी धारावी पुनर्विकास प्रकल्प प्राधिकरणाने केली आहे. कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी मुंबई महापालिकेवर टाकण्यात आली असून महसूल व वन विभागाने पालिका आयुक्तांना पत्र लिहून ही जमीन रिकामी करण्याची विनंती फेब्रुवारी महिन्यात केली होती.
मुलुंड कचराभूमीवरील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ज्या पद्धतीने बायोमायनिंगचा प्रकल्प हाती घेतला आहे. तसाच प्रकल्प देवनार कचराभूमीवर लावण्याकरीता निविदा मागवण्यात आली आहे.
कोणत्या कंपन्या इच्छुक
देवनार कचराभूमवरील कचरा साफ करण्यासाठी मुलुंड कचराभूमी साफ करण्यासाठी दिलेली कंत्राटदार कंपनी, देवनार येथील कचऱ्यापासून वीज निर्मितीचे कंत्राट दिलेली कंपनी अशा अनेक कंपन्या पुढे आल्या आहेत. तसेच चेन्नई, हैदराबाद येथे कचरा विल्हेवाटीचे काम केलेल्या कंपन्याही पुढे आल्या आहेत. मात्र देवनार कचराभूमीचा प्रचंड व्याप पाहता तेवढी उलाढाल असलेली असलेली कंपनीच पात्र ठरू शकणार आहे.
असा असेल कामाचा व्याप
एकूण जुन्या कचऱ्याचे अंदाजित वजन – १८५ लाख मेट्रीक टन
एकूण व्याप्त जागा – ११० हेक्टर
कचरा हटवण्यासाठी एकूण अंदाजित खर्च – २,३६८ कोटी
कंत्राट कालावधी – तीन वर्षे (पावसाळासहित)
दरदिवशी कचऱ्याची विल्हेवाट – २३ हजार मेट्रीक टन
दर दिवशी वाहनांची ये जा – १२०० प्रतिदिन