मुंबई : मे महिन्याच्या अखेरीस पडलेल्या पावसात मुंबईतील अनेक भाग जलमय झाले. पाणी भरण्याची अनेक नवीन ठिकाणे आढळून आली. पावसाचे पाणी भरण्याची ठिकाणे गेल्यावर्षीच्या तुलनेत वाढल्यामुळे पाणी उपसा करणाऱ्या पंपांची संख्याही मुंबई महापालिकेने वाढवली आहे. आधी ४२२ पंपांची व्यवस्था करण्यात येणार होती. ती संख्या वाढवून आता मुंबईत ५१४ पंप बसवण्यात आले आहेत. तसेच एखाद्या ठिकाणी पंप बंद पडल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून वाहनारुढ फिरते दहा मोठे पंपही तैनात करण्यात आले आहेत.
मुंबईच्या भौगोलिक रचनेमुळे सखल भागात दरवर्षी पावसाचे पाणी जमा होते व त्याचा निचरा होत नाही. मुंबईला चारही बाजूने समुद्राने वेढलेले असून मुंबईत पावसाचे प्रमाणही मोठे आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाणी तुंबण्याचा धोका मुंबईत असतो. मात्र पाणी भरण्याची ठिकाणे कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेने आतापर्यंत ब्रिमस्ट्रोवॅड प्रकल्पांतर्गत कोट्यवधी रुपयांची कामे केली आहेत. तसेच सूक्ष्म नियोजनांतर्गत दरवर्षी विविध ठिकाणच्या पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता वाढवण्याचेही काम केले जात आहे. तरीही मुंबईतील पाणी साचण्याची ठिकाणे कमी झालेली नाहीत. यंदा तर पाणी साचण्याची ठिकाणे कमी होण्याऐवजी त्यात भरच पडली आहे. दक्षिण मुंबईतील कुलाबा, चर्चगेट, मंत्रालय हे परिसर कधीही पाणी न भरण्यासाठी प्रसिद्ध असून ते परिसरही सोमवारच्या पावसाने जलमय झाले. तर गेल्या काही वर्षात उपाययोजना करून जे भाग पूरमुक्त केले त्या भागातही यंदा पाणी साचले होते. त्यामुळे मुंबई महापालिकेने पाणी उपसा करणाऱ्या उदंचन संचांची (पंप) संख्या वाढवली आहे.
यंदा मुंबई महापालिकेने ४२२ ठिकाणी पंप बसवले होती. मात्र २६ मे रोजी पडलेल्या पावसात पाणी भरण्याची ठिकाणे वाढल्यामुळे विभाग कार्यालयातून पंपाची मागणी वाढली होती. त्यामुळे मुंबई महापालिकेने ५१४ ठिकाणी पाणी उपसा करणारे उदंचन संच तैनात केले आहेत. हे उदंचन पंप पावसाळ्यात बंद पडता कामा नये. उदंचन पंपांची यंत्रणा व पर्यायी यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित राहिली पाहिजे, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.
विविध कारणांमुळे हे उदंचन पंप कार्यान्वित न झाल्यास सखल भागामध्ये पाणी साचून राहते. त्यामुळे नागरिांना असुविधेचा सामना करावा लागतो. या समस्येवर मात करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने या वर्षी वाहनांवर आरूढ १० फिरते उदंचन संच तयार ठेवले आहेत. सन २०२५, २०२६, २०२७ आणि २०२८ या चार वर्षांसाठी भाडेतत्वावर वाहनावर आरूढ फिरते उदंचन संच घेतले जाणार आहेत. प्रत्येक वाहनावर २ पंप बसविण्यात येणार असून, प्रत्येक पंपाची क्षमता २५० घनमीटर प्रति तास इतकी आहे. तातडीच्या प्रसंगी या पर्यायी व्यवस्थेचा प्रतिसाद कालावधी कमी असला पाहिजे. जेणेकरून फिरते उदंचन संच तातडीने घटनास्थळी पोहचवता आले पाहिजेत. या वाहनांवर तीन सत्रांमध्ये म्हणजे २४ तास मनुष्यबळ उपलब्ध हवे, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.