मुंबई : अत्याचारग्रस्त महिलांनी केलेल्या तक्रारींबाबत राज्य महिला आयोगाची भूमिका असंवेदनशील, बेजबाबदार आणि पक्षपाती स्वरूपाची असल्याचा आरोप करत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची पदावरून तत्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी महाविकास आघाडीच्या महिला शिष्टमंडळाने मंगळवारी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना केली. शिवसेना ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे, किशोरी पेडणेकर, जयश्री शेळके, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे आणि विद्या चव्हाण तसेच डॉ.ज्योती गायकवाड यांचा या शिष्टमंडळात समावेश होता.
पुणे जिल्ह्यातील वैष्णवी हगवणे या विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित होते. वैष्णवीची मोठी जाऊ मयुरीला कौटुंबिक हिंसाचाराचा सामना करावा लागला होता. तिने या प्रकरणी पोलीस ठाण्यात तसेच महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली असतानाही तिच्या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा ज्या पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत, त्याच पक्षाचे हगवणे हे पदाधिकारी होते. मयुरीच्या तक्रारीची दखल न घेण्यामागे राजकीय हस्तक्षेप होता, असा आरोप शिष्टमंडळातील महिला नेत्यांनी केला.
राज्य महिला आयोग हा महिलांना न्याय मिळवून देणारा एक अत्यंत महत्त्वाचा आणि निष्पक्ष असा संस्थात्मक मंच असावा, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. परंतु आयोगाच्या अध्यक्षपदी एका राजकीय पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपद भूषवणाऱ्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली आहे. ही व्यक्ती पक्षाच्या ध्येयधोरणांच्या प्रसार आणि अंमलबजावणीमध्ये पूर्णवेळ व्यस्त आहे, असे निवेदनात म्हटले आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी पूर्ण वेळ काम करणारी, संवेदनशील, जबाबदार, कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडणारी, कणखर, अराजकीय व्यक्तीची निवड करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.