मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीतील ब्लॉकबस्टर आणि रसिकप्रेक्षकांच्या मनात अक्षरशः घर केलेल्या रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ या हिंदी चित्रपटाला यंदा ५० वर्षे पूर्ण होत आहेत. हेच औचित्य साधून हा चित्रपट अनकट व्हर्जनसह पुन्हा प्रदर्शित होणार आहे. विशेष बाब म्हणजे पुनःप्रदर्शनाच्या व्हर्जनमध्ये अधिकच्या सहा मिनिटांचा समावेश असून ठाकूरने गब्बर सिंहला मारल्याचा मूळ शेवट दाखविण्यात येणार आहे. या चित्रपटाचा प्रीमिअर २७ जून रोजी इटलीच्या बोलग्नाना येथे होणाऱ्या ‘इल सिनेमा रिट्रोवाटो फेस्टिव्हल’मध्ये होणार आहे. तसेच, या चित्रपटाची खास स्क्रीनिंग जुन्या दर्जेदार चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या पियाजा मैगिओरेमध्येही होणार आहे.
रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ हा हिंदी चित्रपट १५ ऑगस्ट १९७५ रोजी प्रदर्शित झाला होता. प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, जया बच्चन, हेमा मालिनी, संजीव कुमार, अमजद खान अशा दिग्गज कलाकारांची मांदियाळी या चित्रपटात होती. आता या चित्रपटाला १५ ऑगस्ट २०२५ रोजी ५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने कोणत्याही कटशिवाय ‘शोले’ पुन्हा मोठया पडद्यावर आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती ‘शोले’ चित्रपटाचे दिग्दर्शक रमेश सिप्पी यांचे पुतणे शहजाद सिप्पी यांनी सांगितले.
दरम्यान, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७५ साली ‘आणीबाणी’ जाहीर केल्यामुळे देशात तणावपूर्ण वातावरण होते. त्यावेळी गब्बर सिंगची हत्या झाल्याचा समावेश असलेल्या दृश्यासह तीन ते चार दृश्ये सेन्सॉर बोर्डने मंजूर केली नव्हती. ‘शोले’ चित्रपटात ठाकूर हा एक पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत असतो आणि आणीबाणीच्या तणावपूर्ण परिस्थितीत कोणत्याही नागरिकाने कायदा हातात घेतल्याचे चित्र दाखविण्यात येऊ नये आणि या दृश्यांचा वास्तवात परिणाम होऊ नये, या अनुषंगाने सदर दृश्याला कात्री लावण्यात आली होती. आता सेन्सॉर बोर्डाच्या सूचनेनुसार किंवा निर्मात्यांनी स्वतःहून चित्रपटाचे संकलन करताना कात्री दिलेल्या सर्व दृशांसह ‘शोले’ पुन्हा मोठ्या पडद्यावर अवतरत आहे. फिल्म हेरिटेज फाउंडेशन आणि सिप्पी फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी संयुक्तपणे ‘शोले’ चित्रपटात कट दृश्यांना पुन्हा जोडण्याचे काम केले, या प्रक्रियेसाठी तीन वर्षांचा कालावधी लागला. जय, वीरू आणि ठाकूर यांसारखी लोकप्रिय पात्रे, गब्बर सिंहसारखा खलनायक, अॅक्शन आणि लक्षवेधी संवादामुळे ‘शोले’ हा चित्रपट रसिक प्रेक्षकांच्या मनात रुजला आहे. त्यामुळे आता ‘शोले’ हा चित्रपट इटलीतील चित्रपट महोत्सवानंतर भारतातील चित्रपटगृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित होणार का? यासंदर्भातही रसिकप्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.