नागपूर : कुटुंबातल्या प्रत्येकाच्या अधिकाराचे पालन करणे हे पालकाचे कर्तव्य असते. त्याच भावनेतून लोकशाही व्यवस्थेत पालकमंत्री नेमण्याचा शिष्टाचार पाळला जातो. असे असतानाही जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याच मतदारसंघात बालविवाहाच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. असाच एक प्रकार पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने उधळून लावण्यात यश आले. विशेष म्हणजे हा बालविवाह होणारी मुलगी आणि मुलगा दोघेही अल्पवयीन आहेत.

नवीन कामठी ठाण्याचे निरीक्षक महेश आंधळे यांनी याची कुणकूण लागली होती. ते खबऱ्यांच्या संपर्कात होते. त्याची पुष्टी होताच आंधळे यांनी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण यांच्याशी संपर्क साधला. पठाण यांनी तडक जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रंजीत कुरे यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक स्थापन केले. कामठीचे पोलीस निरीक्षक आंधळे यांच्याशी समन्वय साधण्याच्या सूचना देत या पथकाला कामठीत पाठविण्यात आले. जिथे बालविवाहाची कुणकूण लागली होती, त्या सैलाब नगर परिसरात पथकाने छापा टाकला. इथे एक १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी आणि जवळजवळ त्याच वयाच्या एका मुलाच्या विवाहाची तयारी सुरू होती. पोलीस आणि पथकाने संयुक्तपणे कारवाई करीत हा बालविवाह रोखला. त्यावेळी नवरी हळद लावून विवाहासाठी सज्ज होती. मुलगा आणि मुलगी दोघेही अल्पवयीन असल्याने त्यांना कल्याण समितीसमोर हजर करण्यात आले. मुलीची सुरक्षितता लक्षात घेता तिला बालगृहात ठेवण्यात आले.

या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही कुटुंबाचे समुपदेशन करीत त्यांना कायदेशीर नोटीस बजावली. या कारवाईत संरक्षण अधिकारी साधना हटवार, दीप्ती मोडघरे, रुक्मिणी जंगलवार तसेच ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टच्या वैष्णवी बावणे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

अवघ्या १५ दिवसांतली दुसरी घटना

कामठी परिसरात यापूर्वी साधारण १५ दिवसांपूर्वी असाच प्रकार घडला होता. त्यावेळी पोलिसांनी कामठीतल्या कुंभारे कॉलनीत सुरू असलेला बालविवाह उधळून लावला होता. जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात १३ घटना गेल्या वर्षभरात उधळून लागल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वयमर्यादा तपासण्याच्या सूचना

कामठी परिसरात गेल्या काही महिन्यांत बालविवाहाच्या तक्रारी वाढत आहेत. या प्रकारांना आवर घालण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलिसांनी परिसरातील विवाह मंडळ, सभागृह सजावट व्यावसायिक, केटरिंग यांना नोटीस देऊन विवाह सोहळ्यांसाठी वधू-वरांची वयोमर्यादा निश्चित केल्याशिवाय सेवा देऊ नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.