जळगाव – केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील रावेरसह वरणगाव, बोदवड, निंभोरा, मलकापूर आणि नांदुरा या स्थानकांवर लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा देण्याची मागणी काही दिवसांपूर्वी केली होती. त्यांच्या त्या मागणी यश आले असून, रावेरसह बोदवड स्थानकांवर दोन रेल्वे गाड्यांना थांबा मिळाल्याने प्रवाशांची गैरसोय दूर होऊ शकणार आहे.

मुंबई-नागपूर किंवा पुणे-नागपूर दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून प्रवाशांकडून केली जात होती. त्या अनुषंगाने केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन त्या बाबतीत पत्र व्यवहार केला होता. त्यांच्या त्या प्रयत्नांना यश आल्याने पुणे-नागपूर (अजनी) मार्गावर आठवड्यातून सहा दिवस वंदे भारत एक्स्प्रेस धावण्यास सुरूवात देखील झाली आहे.

दरम्यानच्या काळात नवी दिल्ली येथे रेल भवनात रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार यांची भेट घेऊन भुसावळ रेल्वे विभागातील काही वर्दळीच्या स्थानकांवर प्रवाशांच्या मागणीनुसार लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा देण्याबाबत सुद्धा मंत्री खडसे यांनी चर्चा केली होती. त्यापैकी पुणे-दानापूर आणि अमरावती-सुरत या गाड्यांना पहिल्या टप्प्यात थांबा मंजूर झाला आहे. त्या संदर्भात माहिती केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी दिली आहे.

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी १२१५० दानापूर-पुणे एक्स्प्रेसला रावेर येथे, १२६५६/१२६५५ नवजीवन एक्स्प्रेसला बोदवड येथे, २२१७७/२२१७८ महानगरी एक्स्प्रेसला रावेर येथे, ११०५७/११०५८ अमृतसर-मुंबई एक्स्प्रेसला निंभोरा येथे, १२११३/१२११४ गरीब रथ एक्स्प्रेसला मलकापुर येथे, १२७१९/१२७२० जयपुर-हैदराबाद आणि नागपूर-अहमदाबाद प्रेरणा एक्स्प्रेसला नांदुरा येथे, १२१२९/१२१३० आझाद हिंद आणि २०९२५/२०९२६ सूरत-अमरावती एक्सप्रेसला बोदवड येथे थांबा देण्याची मागणी रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांकडे निवेदनाद्वारे केली होती.

या गाड्यांचे थांबे मंजूर झाल्यास शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी, नोकरदार, कामगार वर्ग आणि सामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. संपूर्ण परिसराचा सामाजिक व आर्थिक विकास साधला जाईल. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाकडून त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा मंत्री खडसे यांनी व्यक्त केली होती. प्रत्यक्षात, रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्री रक्षा खडसे यांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत पुणे-दानापूर एक्स्प्रेसला रावेर येथे तसेच अमरावती-सुरत एक्स्प्रेसला बोदवड येथे थांबा मंजूर केला आहे.