राज्याचे समाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी राजीनाम्याची मागणी होत आहे. यावर प्रतिक्रिया देताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी “हीच योग्य वेळ आहे”, अशा शब्दांत सूचक वक्तव्य केलं आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आंबेडकर म्हणाले, “शरद पवार यांनी स्वतः सांगितले आहे की हा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी हे प्रकरण गांभीर्यानं घ्यायचं की नाही हे ठरवायचं आहे. तसेच कधी ना कधी कोणाचा तरी गुन्हा बाहेर पडतोच, त्यामुळे आता तुम्हीच म्हणा ‘धिस ईज अ राईट टाईम'”

औरंगाबादनंतर आता उस्मानाबादचे देखील नामांतर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत, याबाबत विचारले असता प्रकाश आंबेडकर म्हणाले, सरकार टिकवायचं की नाही ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठरवायचं आहे.

आणखी वाचा- पुण्याचं नाव जिजापूर? प्रकाश आंबेडकरांचा खुलासा

कृषी कायद्यांविरोधात मुस्लिम समाज २७ जानेवारीला करणार आंदोलन

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात मागील दीड महिन्यापासून शेतकरी दिल्ली येथे आंदोलन करत आहेत. या आंदोलनाची दखल न्यायालयाने घेतली असून त्यावर एक समिती स्थापन देखील केली आहे. मात्र, या समितीला शेतकर्‍यांनी विरोध दर्शवला आहे. तर दोन वर्षापुर्वी NRC, CAA च्या विरोधात मुस्लिम समाजाकडून दिल्ली येथे शाहिन बाग येथे आंदोलन केले होते. आता त्याच्याच पुढे जाऊन मुस्लिम समाज वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली २७ जानेवारी रोजी राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करणार आहे, असेही यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले.