राज्याच्या हितासाठी आपण आजही शिवसेनेसोबत एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यास तयार असल्याचं वक्तव्य नुकतचं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. यावरुन आता पाटील यांनी घुमजाव केलं आहे. माझं विधान उलट्या पद्धतीने माध्यमांनी दाखवलं असं सांगत शिवसेनाच काय इतर कुठल्याही पक्षाला आमचा कुठलाही प्रस्ताव नाही, असं ते म्हणाले. पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे.

पाटील म्हणाले, “माझं वाक्य उलटं वाचलं गेलं. मी म्हटलं होतं की, जर उद्या आमचं सरकार आलं तर सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, सर्व विधानसभा, लोकसभा आम्ही स्वबळावरच लढणार आहोत. कारण भाजपाच्या वोट बँकेवर आणि मोदींच्या चेहऱ्यावर विजयी व्हायचं नंतर काही तिसरचं करायचं हे चालणार नाही. त्यापेक्षा प्रत्येकानं आपापलं लढावं.”

“त्यामुळे महाराष्ट्रात भाजपाचं सरकार येण्याबाबत हा विषय नव्हता तर निवडणुका स्वबळावर लढवण्याबाबतचा विषय होता. त्यामुळे शिवसेनाच काय इतर दुसऱ्या कोणालाही आमचा सरकार स्थापन करण्याबाबतचा कुठलाही प्रस्ताव नाही,” असं यावेळी पाटील यांनी स्पष्ट केलं.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील ?

“राज्यातील निवडणुकीला अजून चार वर्षाचा अवधी आहे. निवडणुका होतील तेव्हा स्वतंत्रपणे लढल्या जातील. त्यानंतर राज्याच्या हितासाठी शिवसेनेसोबत एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यासाठी तयार आहोत,” असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी कोल्हापुरात केलं होतं.

“बिहारमध्ये नितीश कुमार व लालूप्रसाद यादव यांनी एकत्र निवडणूक लढवली. पण पटत नसल्याने नितेश कुमार यांनी राजीनामा दिला. त्यानंतर ते व भाजपाने एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. महाराष्ट्रात हिंदुत्वाचा असा काही पेच झाल्याने असा बदल व्हावा असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाटले तर ते भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी बोलतील. पण निवडणूक मात्र भाजपचे राष्ट्रीय अध्य़क्ष जे. पी. नड्डा म्हणाले त्याप्रमाणे स्वबळावर लढली जाईल. त्यानंतर राज्याच्या हितासाठी शिवसेनेसोबत एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यास आपण तयार आहोत”, असंही पाटील म्हणाले होते.