पुणे : पावसामुळे पालेभाज्यांच्या लागवडीवर परिणाम झाला आहे. पावसामुळे पालेभाज्यांच्या प्रतवारीवर परिणाम झाला असून, मागणीच्या तुलनेत बाजारात आवक कमी होत आहे. सर्व प्रकारच्या पालेभाज्यांचे दर कडाडले आहेत.

पुणे विभागातील सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, तसेच नाशिक विभागात पालेभाज्यांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. पुण्यातील मार्केट यार्डातील घाऊक बाजारात हवेली, आंबेगाव तालुक्यातून पालेभाज्यांची आवक होते. नवी मुंबईतील वाशी बाजारात नाशिक, मंचर भागातून पालेभाज्या विक्रीस पाठविल्या जातात. मे महिन्यात वळवाच्या पावसामुळे पालेभाज्या, तसेच फळभाज्यांचे मोठे नुकसान झाले. लागवड करण्यात आलेल्या फळभाज्या आणि पालेभाज्या खराब झाल्या. चांगल्या प्रतीच्या पालेभाज्यांचे दर तेजीत असल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील पालेभाजी व्यापारी राजेंद्र सूर्यवंशी यांनी दिली.

पावसाचा सर्वाधिक फटका पालकाला बसला आहे. किरकोळ बाजारात पालेभाज्यांमध्ये पालकाचे दर तेेजीत आहेत. किरकोळ बाजारात पालकाच्या एका जुडीचे दर ५० ते ६० रुपयांपर्यंत आहेत. गेल्या महिन्यात पालकाच्या एका जुडीला घाऊक बाजारात १० ते १५ रुपये दर मिळत होते. त्या वेळी बाजारात दररोज ३० ते ३५ हजार जुडी पालकाची आवक होत होती. पालेभाज्यांमध्ये पालक लवकर खराब होतो. सध्या बाजारात पालकाच्या दररोज १० ते १५ हजार जुडींची आवक होत आहे. पालकासह मेथी, कोथिंबीर, चाकवत, चवळई, शेपू, अंबाडी या पालेभाज्यांचे दर तेजीत आहेत. एका जुडीचे दर ४० ते ५० रुपयांपर्यंत आहेत.

घाऊक बाजारातील पालेभाज्यांच्या शेकडा जुडीचे दर पुढीलप्रमाणे : कोथिंबीर – १५०० ते ३०००, मेथी – २००० ते ३५००, शेपू – १५०० ते २०००, कांदापात- १५०० ते २०००, चाकवत – ५०० ते ८००, करडई- ४०० ते ७००, पुदिना – ४०० ते ६००, अंबाडी – ४०० ते ६००, मुळे – ८०० ते १५००, राजगिरा- ४०० ते ७००, चुका – ५०० ते ८००, चवळई- ४०० ते ७००, पालक- १५०० ते २५००

पावसामुळे पालेभाज्या खराब झाल्या आहेत. पालेभाज्यांमध्ये पालक भिजल्यानंतर लवकर खराब होते. एका जुडीच्या पालकाचे दर ३५ रुपयांपर्यंत पोहोचले होते. मात्र, यंदा पालकाची आवक कमी झाल्याने जुडीला उच्चांकी दर मिळाले आहेत. पालकाच्या एका जुडीचे दर ५० ते ६० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. – राजेंद्र सूर्यवंशी, पालेभाजी व्यापारी, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फळभाज्या शंभरीपार

पावसामुळे फळभाज्यांची आवक कमी प्रमाणावर होत असून, बहुतांश फळभाज्यांचे दर शंभरीपार झाले आहेत. बाजारात विक्रीसाठी पाठविण्यात आलेल्या फळभाज्यांच्या प्रतवारीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे चांगल्या प्रतीच्या फळभाज्यांना दर मिळाले आहेत. मे महिन्यात झालेल्या पावसामुळे काढणीस आलेल्या फळभाज्यांचे मोठे नुकसान झाले. शिल्लक राहिलेल्या फळभाज्यांची तोडणी करून विक्रीस पाठविण्यात येत आहेत. फळभाज्या आणि पालेभाज्यांची आवक वाढणार नाही. त्यामुळे यापुढील काळात दर तेजीत राहणार आहेत, अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील प्रमुख अडते विलास भुजबळ यांनी दिली.