‘ईशान्यदाह’ हा अग्रलेख (१३ डिसेंबर) वाचला. गृहमंत्री अमित शहांच्या पुढाकाराने होत असलेल्या नसत्या उठाठेवींपैकी आणखी एका उठाठेवीला आपण सर्वच भारतीय सामोरे जात आहोत. ईशान्येकडील राज्यांमधून ‘एनआरसी’ (नागरिकत्व नोंदणी) वरून पेटलेला सामाजिक वणवा अद्याप शांत होण्याच्या आधीच नागरिकत्व दुरुस्तीचा कायदा आला. हे म्हणजे ईशान्येकडील जनतेच्या आधीच्या ओल्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे आहे. बहुमताच्या जोरावर व त्या गुर्मीत भाजप काहीही करू शकतो याचा पुन:पुन्हा प्रत्यय आल्याशिवाय राहात नाही. ‘काश्मीरमधील प्रश्न आम्ही सोडवला’ म्हणतात; पण तिथल्या जनतेला न विचारता व तेथील नेत्यांना चार महिने डांबून ठेवून. ईशान्येकडील लोक जात-धर्म बाजूला ठेवून त्यांच्या स्थानिकत्व आणि मातृभाषांवर आधारित समाजरचनेचे त्वेषाने समर्थन करत नागरिकत्व कायद्यात होणाऱ्या बदलाला झुगारून देण्याची जहाल भूमिका घेताहेत. हे नवीन कायदे करताना किंवा घटनेत बदल करताना स्थानिक लोकांना विचारातच घ्यायचे नाही, हा कुठला न्याय?

– द. ना. फडके, डोंबिवली

भूमिपुत्रांनो, आता तरी गंभीर व्हा..

‘शेतकरी देशावर मेहेरबानी करीत नाहीत..’ ही प्रतिक्रिया (‘लोकमानस’, १२ डिसेंबर) पाषाणहृदयी आहे हे खरेच. मात्र ती स्वाभाविक मानली जावी. आज नवश्रीमंत वर्गाला अन्नधान्य जगभरातून उपलब्ध होऊ शकते याची कल्पना आहे, म्हणूनच नदी पार केलेल्या वाटसरूच्या भूमिकेत ते आहेत. भूमिपुत्रांनी आता गंभीर तरी व्हावे अथवा आपल्या कुटुंबाचा विस्तार तरी आटोपता घ्यावा हे योग्य. मतासाठी लाचार नेत्यांपैकी कुणी आपला कैवारी असेल असा स्वप्नातही विचार शेतकऱ्यांनी करू नये. लबाडी व ढोंग अभिमानाने मिरवणारे नेते व त्यांना पर्याय नाही म्हणत हतबल झालेली जनता असताना ‘जय जवान जय किसान’ म्हणणाऱ्या शास्त्रीजींचा वारस येईल ही शक्यताच नाही.

– चंद्रहार माने, वाकड (पुणे)

(‘शेतकरी देशावर मेहेरबानी करीत नाहीत..’ (‘लोकमानस’, १२ डिसेंबर) या पत्रावर आक्षेप घेणारी अनेक पत्रे आली, त्यांपैकी गजानन रामभाऊ निंभोरकर (मलकापूर, अमरावती), अजय नेमाने (पिंपळवाडी, ता. जामखेड, अहमदनगर), विकास नेहरकर (ता. केज जि. बीड) यांची पत्रे उल्लेखनीय होती.)

मोबाइलपासून आता मागे येणे अशक्य..

‘विदाभान’ या सदरातील  ‘समाजमाध्यमांवरची ‘तण’तण’ (११ डिसेंबर) हा लेख वाचला. समाजमाध्यमावर खोटय़ा बातम्या मिळणार, त्यांच्या वापरामुळे आपला खासगीपणा कमी होणार, समाजात फूट पडणार असे विचार सध्या मनात सतत घोंघावत असतात. समाजमाध्यमे आपल्या विचार करण्याच्या प्रक्रियेवर प्रभाव पाडू लागली आहेत.  समाजमाध्यमेच नव्हे तर मोबाइल फोन जरी वापरला तरी आपले ठिकाण समजते इथपासून, तो मोबाइल आपसुक सुरू होऊन आपलीच हेरगिरी करतो अशी माहिती जेव्हा मिळते तेव्हा काही वेळा या सगळ्यांपासून म्हणजे समाजमाध्यमे आणि आधुनिक तंत्रज्ञान यापासून स्वत:ला दूर ठेवावे असे वाटू लागते. पण ते टाळणे आता आपल्या किंवा कुणाच्याही आवाक्यात राहिले नाही. म्हणून हे अवजार प्रगत कसे करता येईल हा लेखातील विचार पटणारा आहे.

– डॉ. कैलास कमोद, नाशिक

राजकीय जाहिरातींवर वचक हवा!

संहिता जोशी यांच्या ‘विदाभान’ सदरात, ‘समाजमाध्यमांवरची ‘तण’तण’ हा लेख वाचला. ‘माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे’ हे ठीक, पण आज ‘समाजप्रियते’ची व्याप्ती वाढली आहे. ऑनलाइन भाषांतरांमुळे भाषिक बंधनेही कमी होताहेत. म्हणूनच कोणत्याही विषयावर ‘समर्थक आणि विरोधक’ हे वर्गीकरण सहज होऊ शकते. शिवाय ते पॅटर्न पद्धतीने पुढे ट्रेण्डमध्ये परावर्तित करता येते. अनेकदा याचा अनुभव प्रगत तसेच विकसनशील राष्ट्रांनी निवडणुकांत घेतला आहे. अशा वेळी ‘फेसबुक’सारख्या माध्यमाने बातम्यांची शहानिशा करणे किंवा राजकीय जाहिरातींवर वचक ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा, ‘बनाना रिपब्लिक’ होण्याचा धोका लोकशाहीवादी राष्ट्रांना संभवतो.

– नकुल संजय चुरी, विरार पूर्व

आमदार, मंत्र्यांच्या मंचांना शांततेचे वावडे?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी मुंबईत, चैत्यभूमीला देशविदेशातून लक्षावधी अनुयायी भेट देतात. या परम दु:खाच्या दिवशी कॅसेट्स आणि सीडीज विक्रेते कर्णकर्कश आवाजाचा अतिरेक करून या दिवसाच्या गांभीर्याला गालबोट लावत असत. उपाय म्हणून मुंबई-ठाण्यातील काही सुजाण महिलांनी ‘शांत चैत्यभूमी अभियान’ राबवून असा गोंगाट करणाऱ्यांना शांतता पाळण्याचे आवाहन करण्यास सुरुवात केली. पांढऱ्या शुभ वस्त्रांतील महिलांच्या रांगेत जाणाऱ्या या शांतता फेरीतील फलकही जनतेला प्रबोधित करणारे असतात. मागील पाच वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमास जनतेच्या प्रतिसादामुळे गोंगाटात लक्षणीय प्रमाणात घट झालेली आहे. मात्र, समाजातील प्रतिष्ठित व धुरीण समजल्या जाणाऱ्या दोन संघटनांकडून मात्र महापरिनिर्वाण दिनाचे गांभीर्य पाळले जात नाही, असे मागील पाच वर्षांच्या अनुभवावरून दिसून आले आहे.

या वर्षीदेखील महापरिनिर्वाणदिनी सर्वत्र शांतता असताना शिवाजी पार्कमधील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आपला मंच उभारणारे केंद्रीय मंत्री रामदास आठवले व पोलीस नियंत्रण कक्षाच्या डावीकडे आपला मंच उभारणारे आमदार प्रकाश गजभिये यांच्या मंचावरून प्रक्षेपित होणाऱ्या तीव्र ध्वनिलहरी मोठय़ा प्रमाणात शांतताभंग करत होत्या. हा मर्यादाभंग महापरिनिर्वाण दिनाचे गांभीर्य पाळणारा निश्चितच नव्हता. ‘शांत चैत्यभूमी अभियान’ हे प्रबोधनाच्या विरोधात नाही. मात्र प्रबोधन व गोंगाट यांत फरक आहे. पथनाटय़े, काव्यवाचन, छोटय़ा छोटय़ा नाटिका, ध्वनिक्षेपण यंत्रणा न वापरता सादर केलेली जागृतीपर गाणी यांद्वारे प्रबोधनाचा वसा चालूच राहिला पाहिजे. मात्र हे प्रबोधन करीत असताना महापरिनिर्वाण दिन हा दु:खाचा दिवस आहे, याचे भान सुटता कामा नये. परिवर्तनाच्या लढय़ाचे नेतृत्व करणाऱ्यांनी ही प्रगल्भता दाखवली तर झालेले परिवर्तन टिकून राहील.

– प्रा. आशालता कांबळे, सुषमा कदम, राजश्री कांबळे, सुलेखा टिकाधर, शीला भगत व ‘शांत चैत्यभूमी अभियान’मधील अन्य कार्यकर्त्यां, गोवंडी (मुंबई)