ठाणे : मनसे आणि ठाकरे गटाची विधानसभा निवडणूकीत वाताहात झाल्यानंतर आता राज आणि उद्धव या दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावेत यासाठी सजामाध्यमांवर चर्चा सुरू झाल्या आहेत. मनसे आणि ठाकरे गटाचे तळागाळातील काही कार्यकर्ते देखील याबाबत खासगी बोलत आहेत. ‘एक रहेंगे, तो सेफ रहेंगे, ‘ठाकरे ब्रँड टिकविण्यासाठी दोघांनीही एकत्र यायलाच हवे’, ‘दोन्ही बंधूंनी महाराष्ट्रासाठी एकत्र यावे’, ‘बाळासाहेबांच्या विचार असलेल्या दोन्ही पक्षांनी एकत्र यावे’, अशा विविध प्रतिक्रिया समाजमाध्यमांवर पाहायला मिळत आहेत. परंतु वरिष्ठ पदाधिकारी यावर थेट भाष्य करणे टाळत आहेत.  

शिवसेनेतून राज ठाकरे बाहेर पडल्यानंतर त्यांनी स्वत:चा पक्ष स्थापन करत निवडणूका लढविल्या. यापूर्वीही दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावेत अशी भावना काही कार्यकर्ते आणि पदाधिकारी व्यक्त करत होते. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी देखील दोन्ही बंधू एकत्र यावेत यासाठी पुढाकार घेतला होता. परंतु त्यावेळी दोन्ही बंधू एकत्र आले नव्हते. मुंबईत अनेक निवडणूकांमध्ये शिवसेना विरुद्ध मनसे असेच चित्र समोर आले होते. यंदाच्या लोकसभा निवडणूकीत मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. तर विधानसभा निवडणूकीत राज ठाकरे यांनी स्वबळावर माहिम सह ठाणे, वरळी, यासह महत्त्वाच्या काही जागांवर उमेदवार उभे केले होते. राज ठाकरे यांनी  या उमेदवारांसाठी सभा देखील घेतल्या. परंतु राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्यासह सर्वच उमेदवारांना निवडणूकीत पराभव पत्करावा लागला. मागील निवडणूकीत राजू पाटील हे कल्याण ग्रामीण मतदारसंघातून निवडून आले होते. त्यांचाही आताच्या विधानसभा निवडणूकीत शिंदे गटाचे पदाधिकारी राजेश मोरे यांनी पराभव केला.

हेही वाचा >>>Kalyan West Vidhan Sabha : कल्याण पश्चिमेत शिंदेसेनेचे ‘समझोत्या’चे विश्वनाथ भोईर कायम

या निवडणूकीत मनसेला एकही जागा मिळालेली नाही. त्यामुळे हा पराभव मनसेच्या जिव्हारी लागला आहे. तर ठाकरे गटाचे अनेक दिग्गज नेते मुंबई, ठाणे आणि कोकणात पराभूत झाले आहेत. मनसे आणि ठाकरे गटाची झालेली वाताहत पाहून आता दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येण्याची चर्चा होऊ लागली आहे. मनसे आणि ठाकरे गटाचे पदाधिकारी खासगीत दोन्ही बंधू एकत्र यावेत अशी तळमळ व्यक्त करत आहेत. तर या दोन्ही पक्षांचे चाहते,  कार्यकर्ते समाजमाध्यमांवर उघडपणे दोन्ही बंधूंनी एकत्र यावे अशी प्रतिक्रिया देत आहेत. राज ठाकरे यांनी पराभवानंतर ‘अविश्वसनीय ! तूर्तास एवढेच… ’ अशी पोस्ट समाजमाध्यमावर लिहीली होती. त्यानंतर त्यांच्या या पोस्टवर दोन्ही ठाकरेंनी एकत्र येण्यासाठी प्रतिक्रिया येऊ लागल्या. ‘एक रहेंगे तो सेफ रहेंगे, ‘ठाकरे ब्रँड टिकविण्यासाठी दोघांनीही एकत्र यायलाच हवे’, ‘दोन्ही बंधूंनी महाराष्ट्रासाठी एकत्र यावे’, ‘बाळासाहेबांच्या विचार असलेल्या पक्षांनी एकत्र यावे’, एकत्र आल्यास महाराष्ट्रात बदल घडू शकतो अशा विविध प्रतिक्रिया वाचायला मिळत आहेत. त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार की, वेगळा मार्ग पत्करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.  

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नुकत्याच निवडणुका झाल्या आहेत. कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा. राज ठाकरे यांच्या नेतृत्वानुसार आम्ही वाटचाल करत असतो, त्यांच्यावर आमचा विश्वास आहे. तसेच कोणत्या पक्षासोबत जावे किंवा जाऊ नये हे राज ठाकरेच ठरवतील. – संदीप पाचंगे, सरचिटणीस, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना.