ठाणे : मुंब्रा येथील रेल्वे स्थानकाजवळ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या लोकल गाडीतून पडून मृत पावलेल्या पाच प्रवाशांच्या कुटूंबियांना मुख्यमंत्र्यांनी पाच लाखांची मदत जाहिर केली आहे. तर, जखमींना ५० हजार ते दोन लाखांपर्यंतची मदत करण्यात येणार आहे. शिवाय, त्यांच्या उपचाराचा खर्च शासनातर्फे करण्यात येणार आहे, अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केली.

मुंब्रा येथील रेल्वे स्थानकाजवळ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या लोकल गाडीतून १३ प्रवासी पडून त्यापैकी पाच प्रवाशांचा मृत्यु झाला आहे. तर त्यापैकी सात रुग्णांवर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहे तर, उर्वरित रुग्णांवर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनीही कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपुस केली. तसेच त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचाराची माहिती डाॅक्टरांकडून घेतली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राज्य सरकारतर्फे मृत आणि जखमींच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्याची घोषणा केली.

आतापर्यंत अनेक रुग्णांना भेटलो पण, असा अपघात कधीही घडला नव्हता. हा अपघात का घडला आणि कशामुळे घडला, याची चौकशी रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मदत जाहीर केली आहे. मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना मदत म्हणून ५ लाख रूपये तर, जखमींना ५० हजार ते दोन लाखांपर्यंत मदत आणि त्यांचा उपचाराचा खर्च शासन करणार आहे. ज्युपिटर रुग्णालयात दोन रूग्ण आहेत त्यांचा खर्च सुद्धा शासन करेल, अशी माहिती मंत्री महाजन यांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माझ्या माहीतीनुसार वळण भागात सर्वे सुरू होता आणि त्याठिकाणी काय उपाय करायचा, काय इलाज करायचा यावर सुद्धा चर्चा झालेली होती. याठिकाणी कायम स्वरूपी जो काही उपाय आहे, तो तात्काळ करावा अशी विनंती रेल्वे मंत्रालयाला आम्ही करणार आहोत. राज्य शासनाच्या माध्यमातून सुद्धा अतिशय गांभीर्याने हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणार आहोत. रेल्वे घड्याळाच्या सेकंद काठावर चालत असते, काही तांत्रिक कारणामुळे काही वेळेस उशीर होतो. परंतु अशा प्रकारचा अपघात पहिल्यांदा झाला आहे आणि असे पुन्हा होणार नाही या संदर्भात काळजी घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.