ठाणे : सांगली जिल्ह्याचे नाव सर्वत्र व्यापार क्षेत्रासाठी अभिमानाने घेतले जाते. या जिल्ह्यात हळद आणि बेदाणेचा व्यापार होतो आणि त्यासाठी हा जिल्हा प्रसिद्ध आहे. पण, दुदैवाने घरणेशाहीची राजकीय कीड लागलेला कोणता जिल्हा असेल तर तो आमचा सांगली जिल्हा असेल, असे मत डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी सोमवारी ठाण्यात व्यक्त केले.

सांगली जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आणि डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील, सातारा जिल्ह्यातील पहिला हिंद केसरी संतोष आबा वेताळ, पैलवान विकास पाटील, सायगावचे उरसरपंच सागर वंजारी, सुरलीचे उपसरपंच कृष्णात भादणे, अमोल घोगे, सुशांत जाधव, संजय कांबळे, लक्ष्मण मंडळे यासह शेकडो कार्यकर्त्यांनी सोमवारी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या वेळी मंत्री उदय सामंत, आमदार सुहास बाबर, शिवसेना सचिव राम रेपाळे, दिपाली सय्यद उपस्थित होते.

या पक्षप्रवेशानंतर चंद्रहार पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधत आपल्या भावना व्यक्त केल्या. लोकसभा निवडणुकीत सांगलीमधून मला ६० हजार मते मिळाली. या मतांचा आकडा फारसा मोठा नाही. कारण, लोकसभा निवडणुकीत उमेदवार दोन ते तीन लाख मते घेतो. तुलनेने मला मिळालेल्या मतांची संख्या कमी असली तरी एका शेतकऱ्याच्या मुलाला हरविण्यासाठी सर्व दिग्ज नेते एकवटले होते. तरीही ६० हजार मते मिळविली असून यामुळेच ही मते माझ्यासाठी महत्वाची आहेत, असेही ते म्हणाले. सांगली जिल्ह्याचे नाव सर्वत्र व्यापार क्षेत्रासाठी अभिमानाने घेतले जाते. या जिल्ह्यात हळद आणि बेदाणेचा व्यापार होतो आणि त्यासाठी हा जिल्हा प्रसिद्ध आहे. पण, दुदैवाने घरणेशाहीची राजकीय कीड लागलेला कोणता जिल्हा असेल तर तो आमचा सांगली जिल्हा असेल, असेही ते म्हणाले.

महायुती, मविआ शत्रुसारखे उभे राहिले…

माझा कुठल्या पक्ष, नेत्याला आक्षेप नाही. पण, महाविकास आघाडीला माझा आक्षेप आहे. कारण, लोकसभेची निवडणुक मी लढविली आणि त्याठिकाणी काय घडले, हे सर्वांनी पाहिले. एका शेतकऱ्याच्या मुलाला हरविण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी हे दोघेही माझ्यासमोर शत्रुसारखे उभे राहीले. परंतु मी एकटा लढलो. जिल्हा परिषद निवडणुकीनंतर मी थेट लोकसभेची निवडणुक लढलो. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा एकही सदस्य सोबत नसतानाही निवडणुक लढलो. या निवडणुकीत मागे हटलो नाही आणि एकटा हि निवडणूक लढलो, असे पाटील म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुस्ती क्षेत्रातला दोनवेळा मुख्यमंत्री

उबाठा गटात असताना अनेक आंदोलन केली. पण, प्रश्न मार्गी लागले नाही. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी क्रीडा क्षेत्रासाठी शब्द दिला म्हणून पक्षात प्रवेश करतोय. एकनाथ शिंदे हे विद्यमान उपमुख्यमंत्री आहेत आधी मुख्यमंत्री होते आणि पुढे भविष्यात पुन्हा मुख्यमंत्री होतील. परंतु मी सुद्धा माझ्या म्हणजेच कुस्ती क्षेत्रातील दोनवेळा मुख्यमंत्री झालो आहे. आम्हाला लाल माती कष्ट, संघर्ष आणि प्रामाणिकपणाने काम करण्याची शिकवण देते. त्यामुळेच मला ताकद दिली तर ६० हजारांची ६ लाख मते करून दाखविन, असेही पाटील म्हणाले.