येऊरच्या पायथ्याशी असलेल्या उपवन तलावाकाठी ठाणे शहरातील सर्वात मोठा कला महोत्सव भरला असून जिल्ह्य़ातील इतर उपनगरे तसेच मुंबईतून हजारो कलारसिक या महोत्सवात सहभागी होतील, अशी अपेक्षा केली जात आहे. मात्र उत्सव काळात रविवापर्यंत उपवनला जाणारी बससेवा शिवाईनगपर्यंतच मर्यादित ठेवून टीएमटीने सर्वसामान्य कलारसिकांची वाट अडवली आहे. ठाणे रेल्वे स्थानकाबाहेरच्या सॅटीसवरून एरवी टीएमटीची उपवन बस फेरी सुरू असते. महोत्सव काळात येणारे पर्यटक तसेच कलारसिकांच्या सोयीसाठी ही सेवा वाढविणे गरजेचे होते. मात्र जादा बस फेऱ्या सुरू करणे दूर, आहे त्या फेऱ्या मर्यादित करून टीएमटीने आपल्या अरसिकतेचे दर्शन घडविले आहे. त्यामुळे ठाणे स्थानकापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या उपवनस्थळी जाण्यासाठी रसिकांना रिक्षेपोटी ५० ते ६० रुपये मोजावे लागत आहेत. उपवनच्या या कला महोत्सवासाठी आधी ५० रुपये प्रवेशशुल्क ठरले होते.
मात्र सर्वसामान्य रसिकांना कोणताही भरुदड पडू नये म्हणून या उत्सवातील प्रवेश विनामूल्य करण्यात आला आहे. सकाळ-संध्याकाळी होणारे संगीताचे कार्यक्रम वगळता इतर सर्व दालनात रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे. मात्र टीएमटीच्या उदासीनतेमुळे उपवनला जाण्या-येण्यातच रसिकांना शंभर-सव्वाशे रुपये मोजावे लागत आहेत.
शहराच्या कानाकोपऱ्यात जात असल्याने परिहवन सेवेद्वारे शहरातील घडामोडींचे दर्शन घडत असते. मात्र उपवन आर्ट फेस्टिव्हलबाबत टीएमटीने दाखविलेली ही उदासीनता कोडय़ात टाकणारी आहे. या महोत्सवाचा लाभ घेत टीएमटीला आपली प्रतिमा सुधारण्याची संधी होती. मात्र महोत्सवाकडे सपशेल पाठ फिरवून टीएमटी प्रशासनाने ही संधी गमावली आहे. यासंदर्भात टीएमटीचे व्यवस्थापक देविदास टेकाळे यांनी महोत्सवासाठी कोणत्याही स्वरूपाची अतिरिक्त सेवा सुरू केली नसल्याचे सांगितले.  
महोत्सवामुळेच सेवा बंद
मोठय़ा प्रमाणात प्रसिद्धी करण्यात आल्याने ठाण्याबाहेरील अनेक कलारसिक शुक्रवारी सकाळीच ठाण्यात आले. त्यातील काहीजणांनी आधी सॅटीसवरून उपवनला जाण्यासाठी बसची चौकशी केली असता उपवन बंद असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यावर ‘उपवनला ‘कला महोत्सव’ आहे ना अशी विचारणा त्यांनी केली असता तेथील नियंत्रकाने त्यामुळेच बससेवा बंद ठेवण्यात आल्याचे उत्तर दिले. ‘उपवनऐवजी शिवाईनगर गाडी पकडा तिथून चालत जा,’ असेही त्याने सांगितले. शिवाईनगरहून उपवन साधारण पाऊण किलोमीटर अंतरावर आहे.