Marathi Actor Shantanu Gangane : मराठी मालिकाविश्वात काम करणारे अनेक कलाकार वेळेत मानधन मिळत नसल्याची तक्रार वारंवार करतात. मालिका सुरू झाल्यावर साधारण ९० दिवसांनी पहिला चेक मिळतो किंवा काही वेळेला ५ ते ६ महिने मानधन दिलं जात नाही असे आरोप अनेक कलाकारांकडून यापूर्वी करण्यात आले आहेत. यावर उपाय म्हणून तसेच मालिकाविश्वात काम करणाऱ्या कलाकार व तंत्रज्ञांना न्याय मिळवून देण्यासाठी एका लोकप्रिय मराठी अभिनेत्याने पुढाकार घेतला आहे. ‘पारू’ मालिकेतून घराघरांत पोहोचलेल्या अभिनेता शंतनू गंगणेने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत याविषयी भाष्य केलं आहे.
अभिनेता म्हणतो, “नमस्कार, मी शंतनू शिवाजीराव गंगणे, मराठी चित्रपट व टीव्ही कलाकार तसेच कार्यकारी निर्माता आणि भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठ पुणे शहर उपाध्यक्ष म्हणून एक अत्यंत गंभीर मुद्दा मांडत आहेत…. आपल्यापैकी अनेक कलाकार, तंत्रज्ञ, मेकअप आर्टिस्ट, डिझायनर यांना मानधनासाठी ९० दिवसांनंतरही साधारण १२० ते १५० दिवस वाट पाहावी लागते. ज्यांच्याकडे दुसरे उत्पन्न आहे ते सुदैवी; पण जे पूर्णपणे या व्यवसायावर अवलंबून आहेत, त्यांच्यासाठी हा प्रकार भीषण आहे. अनेकवेळा त्यांना रक्कम कमी करून घ्यावी लागते, तडजोड करावी लागते, किंवा तक्रार नोंदवली तर काम मिळेल की नाही ही भीती वाटते. याशिवाय काही कलाकारांना त्यांचं मानधन सुद्धा मिळत आहे. ही मानसिकता बदलण्याची वेळ आली आहे. आपण सगळ्यांनी आवाज उठवण्याची वेळ आली आहे.”
अभिनेता पुढे म्हणाला, “मालिकाविश्वातील कलाकारांच्या मदतीसाठी कोणतीही संघटना नाही. ९० दिवसांनी पैसे ही संकल्पना नेमकी कोणी सुरू केली याची मला खरंच कल्पना नाही. ९० दिवसांनीही अनेकांना पेमेंट मिळत नाही. भारत सरकारची जी मायक्रो बिझनेसची स्किम आहे. याअंतर्गत रजिस्टर झालेल्या कंपन्यांना चॅनेल ४५ दिवसांमध्ये पेमेंट करतं. मग निर्मात्यांना ४५ दिवसांमध्ये पैसे मिळूनही या कंपन्या कलाकारांना वेळेत पैसे का देत नाहीत? हे चुकीचं आहे. याच्याबद्दल मी आवाज उठवतो आहे.”
“आपलीही अशीच तक्रार असल्यास मला WhatsApp वर तुमची तक्रार माननीय सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या नावे अर्ज करून मला १८ जून पर्यंत पाठवावी किंवा माझ्याबरोबर यावे ही विनंती. ( १८ जून नंतर माननीय मंत्री महोदय यांची वेळ घेऊन त्यांच्याकडे सर्वांच्या तक्रारी पोहोचवल्या जातील ) अत्यंत महत्त्वाची विनंती – ज्यांना शक्य आहे त्या सर्वांनी ही पोस्ट शेअर करावी. जेणेकरून ही माहिती जास्तीत जास्त कलाकार तंत्रज्ञ आणि कामगारांपर्यंत पोहोचू शकेल, ज्यांच्याबरोबर अशा प्रकारचा अन्याय किंवा त्रास झाला आहे, त्यांना न्याय मिळेल.” असं आवाहन शंतनूने मालिकाविश्वात काम करणाऱ्या कलाकारांना केलं आहे.