मुंबई : राज्यसभेच्या सहा जागांसाठी शुक्रवारी होणाऱ्या निवडणुकीत राज्यात कमालीची चुरस निर्माण झाली आहे. घोडेबाजाराच्या आरोपामुळे गाजलेल्या या निवडणुकीत भाजप, शिवसेना की काँग्रेसचा उमेदवार ‘सातवा’ म्हणजे पराभूत होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यसभा निवडणुकीत नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना न्यायालयाने मतदानाला परवानगी नाकारल्याने सत्ताधारी महाविकास आघाडीच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. त्यांना उच्च न्यायालयात दिलासा मिळावा, असे प्रयत्न आहेत़  परंतु, आघाडीचे दोन मतांचे गणित बिघडले. हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाची तीन मते मिळण्याचा महाविकास आघाडीला अंदाज होता, परंतु ठाकूरही साथ देण्याबाबत साशंकता आह़े

‘एमआयएम’ची दोन मते शिवसेनेसाठी अडचणीची ठरणारी आहेत. सहाव्या जागेसाठी शिवसेना व भाजपमध्ये चुरशीची लढत आहे. विजयासाठी पहिल्या पसंतीच्या ४१.०१ मतांची आवश्यकता आहे. शिवसेना व भाजपला अतिरिक्त उमेदवार निवडून आणण्यासाठी अपक्ष व छोटय़ा पक्षांची गरज लागणार आहे. अपक्ष व छोटय़ा पक्षांचे २९ आमदार असून, ते कोणती भूमिका घेतात यावर शिवसेना व भाजपचे भवितव्य अवलंबून आहे. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसने मतांचे नियोजन करताना परस्परांना फायदा होईल, अशी व्यवस्था केली आहे. तिन्ही पक्षांच्या आमदारांनी दुसऱ्या पसंतीची मते शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराला द्यावीत, अशी सूचना करण्यात आली आहे. तिन्ही पक्षांनी गुरुवारी सायंकाळी पहिल्या व दुसऱ्या पसंतीची मते कोणाला द्यायची याचे प्रशिक्षण आमदारांना देण्यात आले.

शिवसेना आणि भाजपमध्ये अतिरिक्त जागेवरून चुरस निर्माण झाली असतानाच, दुसरीकडे भाजपने काँग्रेस उमेदवाराला पराभूत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. काँग्रेसचा उमेदवार पराभूत होणे, हे भाजपसाठी अधिक फायद्याचे आहे. त्यातून राज्यसभेतील काँग्रेसचे संख्याबळ कमी होऊ शकेल. मात्र, बाहेरचा उमेदवार आणि आमदारांमधील नाराजी यातून काँग्रेसने खबरदारी घेतली आहे. नाराज आमदारांशी पक्षाच्या नेत्यांनी वैयक्तिक चर्चा केली आहे.

खुल्या पद्धतीने मतदान 

राज्यसभेसाठी खुल्या पद्धतीने मतदान होते. त्यानुसार राजकीय पक्षांच्या आमदारांना आपल्या पक्षाच्या प्रतोदाला दाखवून मतदान करावे लागते. आमदाराने पक्षादेश धुडकावल्यास त्या आमदाराच्या विरोधात पक्षाला पक्षांतरबंदी कायद्याखाली कारवाई करता येते. अपक्षांना मात्र मतपत्रिका दाखविण्याचे बंधन नसते. राज्यसभा निवडणुकीत आमदारांची मते बाद होण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. हरयाणामध्ये काँग्रेसच्या १४ आमदारांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या पेनाऐवजी वेगळय़ा शाईच्या पेनाचा वापर केल्याने ही मते बाद ठरली होती. गुजरातमध्ये काँग्रेसच्या दोन आमदारांनी मते भाजपच्या नेत्यांना दाखविल्याने ती मते बाद ठरली होती. या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी मतदान कसे करायचे याचे प्रशिक्षण आपापल्या आमदारांना दिले आहे.

उमेदवार :  प्रफुल्ल पटेल (राष्ट्रवादी), संजय राऊत (शिवसेना), पीयूष गोयल (भाजप), इम्रान प्रतापगढी (काँग्रेस), अनिल बोंडे (भाजप), संजय पवार (शिवसेना), धनंजय महाडिक (भाजप)

आमदारांचे संख्याबळ

१०६ भाजप

५५ शिवसेना

५३ राष्ट्रवादी

४४  काँग्रेस

अपक्ष व छोटे पक्ष २९

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajya sabha election in maharashtra voting for rajya sabha today in maharashtra zws
First published on: 10-06-2022 at 05:06 IST