मुंबई : राज्यात मोसमी पाऊस दाखल झाल्यानंतर काही दिवस पाऊस जोरदार कोसळला. त्यानंतर ३० मे पासून पावसाचा जोर ओसरला. काही ठिकाणी अधूनमधून हलक्या सरी बरसत आहेत. मात्र, जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार उत्तर महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा, पूर्व विदर्भात आजपासून पुढील दोन दिवस विजांसह वादळी पावसाचा सतर्कतेचा इशारा (यलो अलर्ट) देण्यात आला आहे. तर, राज्याच्या इतर भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मागील पाच दिवसांपासून मोसमी वाऱ्यांची गती मंदावल्याने राज्यात पावसाचा जोर कमी आहे. पावसाचा जोर आता ओसरला असला तरी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मात्र, मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. जूनमध्ये राज्यात अनेक भागात एकूण पाऊस हा सरासरीएवढा किंवा सरासरीपेक्षा जास्त राहील अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यानुसार पुढील आठवड्यात पुन्हा एकदा मोसमी पाऊस जोर धरण्याची शक्यता आहे. यावेळी अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे , मराठवाड्यातील जळगाव, छत्रपती संभाजीनगर, तर विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात आज वादळी वाऱ्यासह सतर्कतेचा इशारा (यलो अलर्ट) देण्यात आला आहे. याचबरोबर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा येथे विजांसह हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मोसमी वारे जैसे थे
मोसमी वाऱ्यांनी २८ मे रोजी मुंबई, अहिल्यानगर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांपर्यंत मजल मारली होती. मात्र, त्यानंतर मोसमी वाऱ्यांचा प्रवाह मंदावला. मोसमी वाऱ्यांची सीमा आजही मुंबई, अहिल्यानगर, अलिदाबाद, भवानीपटना, पूरी आणि बालूरघाट भागात होती.
पाऊस का रेंगाळला आहे
कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांची वाटचाल जलद झाली. मात्र, सध्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालेली नाही किंवा तशी शक्यताही नाही. याचबरोबर मेडन ज्युलिअन ऑक्सिलेशन (एमजेओ) प्रभावी नसल्याने मोसमी वाऱ्यांची तीव्रता कमी झाली आहे.
सर्वाधिक पाऊस सिंधुदुर्गात
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १ ते ३१ मे या कालावधीत सिंधुदुर्गमध्ये ५६४.७ मिमी पावसाची नोंद झाली. मे महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. त्यानुसार अनेक भागात मे महिन्याच्या सुरुवातीपासून ते अगदी मोसमी पाऊस दाखल होईपर्यंत वळवाचा पाऊस कोसळत होता. सिंधुदुर्ग बरोबरच रत्नागिरी येथे ५५७.६ मिमी पाऊस नोंदला गेला. बुलढाणा येथे १८७.४ मिमी, तसेच रायगड येथे ४५९.४ मिमी पावसाची नोंद झाली.