नाशिक – मुंबई नाका आणि द्वारका परिसरातील फेरीवाले, उड्डाण पुलाखाली अनधिकृत बस्तान मांडणारे विक्रेते, प्रमुख चौकात स्वच्छतेचा अभाव, अनधिकृतपणे थांबलेल्या रिक्षांवर कारवाईकडे दुर्लक्ष यावरून राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी पोलीस आणि महापालिका प्रशासनावर तीव्र रोष प्रगट केला. यावेळी काही अधिकाऱ्यांनी ही आपल्या विभागाची जबाबदारी नसल्याचे सांगितल्यावर भुजबळ यांचा पारा चढला. त्यांनी संबंधितांना अक्षरश: धारेवर धरले, उपरोक्त बाबींवर कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही भुजबळांनी दिला.

सतत वाहतूक कोंडी होणाऱ्या मुंबई नाका आणि द्वारका चौक परिसरास शनिवारी भुजबळ यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी प्रमुख अधिकारी उपस्थित नसल्याने त्यांनी खास आपल्या उपरोधिक शैलीत संबंधितांना खडसावले. हे विषय त्यांना जिव्हाळ्याचे वाटत नाही. अतिशय व्यस्त अधिकारीवर्ग आहे. त्यांना इतके काम असते की मानस हॉटेलमध्ये (कसारा घाट) जाऊन चर्चा करावी लागते. संध्याकाळी ते तिकडे जातात. याची संपूर्ण माहिती आपल्याकडे आहे, असे भुजबळ यांनी लक्षात आणून दिले.

मुंबई नाका आणि द्वारका सर्कल या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तातडीने सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करावी. परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस, महानगरपालिका आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने संयुक्तपणे कार्यवाही करावी, अशी सूचना भुजबळ यांनी केली.

मुंबई येथील हाजीअली परिसरात वाहतूक नियंत्रणासाठी कार्यान्वित सिग्नल यंत्रणेच्या धर्तीवर या परिसरात यंत्रणा कार्यान्वित करावी. या सिग्नलवरील वाहतूक सरळ दिशेने राहील, याची दक्षता घ्यावी लागणार आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांविरुद्ध कारवाई करताना त्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत होणार नाही. तसेच रस्त्यावर वाहने थांबविणाऱ्याविरुद्ध कारवाई करावी, अशी सूचनाही त्यांनी केली. यावेळी म्हाडाचे सभापती तथा शहराध्यक्ष रंजन ठाकरे, पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, महानगरपालिकेचे शहर अभियंता संजय अग्रवाल, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता दिलीप पाटील, राष्ट्रवादीचे (अजित पवार) युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, समाधान जेजुरकर, नाना पवार आदी उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

छोट्या कामांकडे दुर्लक्ष

मुंबई नाका आणि द्वारका परिसरात मोठ्या प्रमाणात फेरीवाला विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यांनी त्याच ठिकाणी संसारही थाटले आहेत. वर्षभरापासून ते हटविण्याबाबत मनपा, पोलीस प्रशासनाला सूचना देण्यात आलेल्या आहेत. मात्र वारंवार सांगून देखील छोटी छोटी कामे अधिकाऱ्याकडून होत नसल्याचे खडेबोल भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.परिसरातील विक्रेत्यांना तातडीने हटवावे, परिसरातील विक्रेते व कुटुंबियांचे स्थलांतर करावे. या परिसराची नियमित स्वच्छता करावी, असे भुजबळ यांनी सूचित केले.