डहाणू : डहाणू तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत चळणी अंतर्गत येणाऱ्या सुखडआंबा गावातील जलजीवन मिशन योजनेतील टाकीचा स्लॅब कोसळून १७ मार्च २०२५ रोजी दोन शाळकरी मुलींचा मृत्यू झाला असून एक मुलगी जखमी झाली होती. याविषयी आमदार विनोद निकोले यांनी १ जुलै रोजी पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला. निकोलेंच्या प्रश्नाला पाणीपुरवठा तथा स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी समाधान कारक उत्तर दिले असून दोन अधिकाऱ्यांचे तत्काळ निलंबन करत असल्याचे जाहीर केले.
सुखडआंबा येथील घटनेनंतर तत्काळ ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पंचायत समिती मधील कंत्राटी कर्मचाऱ्याचे निलंबन करण्यात आले होते. या प्रकरणी पाणी पुरवठा विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि मृत मुलींच्या कुटुंबीयांना अधिकची भरपाई द्यावी यासाठी आमदार विनोद निकोले यांनी लक्षवेधी उपस्थित केला.
याला उत्तर देताना पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी या प्रकरणी पाणी पुरवठा विभगातील उपअभियंता बी.के.शिंदे आणि कार्यकारी अभियंता आर.आर. पाध्ये यांचे तत्काळ निलंबन करत असल्याचे जाहीर करत ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्याची सूचना देण्याचे सांगितले असून, मृत मुलींच्या कुटुंबीयांना अधिकची भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
चळणी ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत सुखडआंबा येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी साठवून गावात वितरण करण्यासाठी जलकुंभ बांधण्यात आले होते. या जलकुंभावर १७ मार्च रोजी तीन मुली गेल्या असताना यातील दोन मुलींचा टाकीचा स्लॅब कोसळल्यामुळे उंचावरून खाली पडून दुर्दैवी मृत्यू आला असून एक मुलगी थोडक्यात बचावली होती. या प्रकरणामुळे जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजनांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असून योजनेच्या कामांची चौकशी करण्याची गरज व्यक्त होत आहे.
सुखडआंबा येथील घटनेनंतर पाणी पुरवठा विभगातील कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. उपअभियंता आणि कार्यकारी अभियंता यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार वरिष्ठ पातळीवर अधिकाऱ्यांकडे असून त्यांच्याकडून आलेल्या आदेशानुसार पुढील कारवाई करण्यात येईल. – मनोज रानडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पालघर