पुणे : पुणे-नाशिक महामार्गावर रस्त्याच्या कडेला असलेली अतिक्रमणे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हटवूनही या रस्त्यावरील वाहतूक कोंडी कायम असल्याचे चित्र आहे. तसेच, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (एनएचएआय) रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने प्रवासी वाहनांबरोबरच शेती मालाची वाहतूक करणारे व्यापारी, शेतकरी, औद्योगिक कंपन्यांसाठी माल वाहतूक करणारी वाहने महामार्गावर अडकून पडत आहेत. त्यामुळे येथील उद्योगांवर परिणाम होत आहे.
उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या ‘राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६०’मुळे पुणे-नाशिक या दोन शहरांतील प्रवासाचा कालावधी कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत चालला आहे. उत्तर महाराष्ट्रातून येणारी वाहने चाकण औद्योगिक वसाहतीमार्गे मुंबई, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर मार्गावर जातात. पुण्यामध्ये तळेगाव, चाकण आणि रांजणगाव या ठिकाणी मोठ्या औद्योगिक कंपन्या आहे. तसेच, शेतमालासाठी मार्केट यार्ड, कृषी उत्पन्न बाजार समिती असल्याने या मार्गावरून कंपन्यांच्या कच्चा मालाची आणि शेतमालाची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. या मार्गावर वाहतूक कोंडी होत असल्याने त्याचा फटका औद्योगिक कंपन्या, शेतमाल वाहतुकीला बसत आहे.
खेड ते सिन्नरपर्यंत रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. तसेच, तळेगाव, चाकण परिसरातील महामार्गालगत उभा राहणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बस, खासगी कंपन्यांच्या बस, उलट्या दिशेने होणारी वाहतूक, तळेगाव चौकात अनधिकृत रिक्षा थांबे, रस्ता दुभाजक नसल्याने बिनदिक्कत रस्ता ओलांडणारे वाहनचालक अशा अनेक कारणांमुळे अपघाताची परिस्थिती निर्माण होत आहे. परिणामी नियमित वाहतुकीवर परिणाम होत असून वाहनचालकांना नियोजित ठिकाणी पोहचण्यास विलंब होत आहे.
कंपन्यांमध्ये होणाऱ्या कच्च्या मालाची वाहतूक विस्कळित होत असल्याने औद्योगिक वसाहतीवर परिणाम झाला आहे. कामगारांना येण्या-जाण्यासाठी असलेली वाहने वाहतूक कोंडीत अडकल्याने कामगारांना कंपन्यांमध्ये पोहोचण्यास विलंब होत आहे. यामुळे कंपन्यांपुढे गंभीर समस्या निर्माण झाली असून, चाकणला पर्यायी मार्ग म्हणून बायपास तयार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. वाहतूक पोलिसांना निवेदन दिल्यानंतरही वाहतूक कोंडी कायम आहे. – आशिकेष पाटील. व्यावसायिक, चाकण
पुणे-नाशिक क्रमांक ६० या महामार्गावर खेड ते सिन्नरपर्यंत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (एनएचएआय) काँक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. येत्या सव्वा महिन्यात हे काम पूर्ण होईल. तर, पुणे-नाशिक महामार्गावरील नाशिक फाटा ते राजगुरूनगर या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) राज्य सरकारकडून मंजूर झाला आहे. लवकरच या कामाची निविदा प्रक्रिया राबवून कार्यारंभ आदेश देऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येईल. – ओंकार जगदाळे, समन्वय अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पुणे विभाग