ठाणे – जिल्ह्यात गुरूवारी सकाळपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली. ठाणे शहरातील अनेक भागात वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. तर, मुंबई नाशिक महामार्गावर पावसामुळे वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र होते. तर, कल्याण डोंबिवलीत पावसाचे पाणी तुंबून नागरिकांना त्रास होऊ नये या साठी पथके कार्यरत होती.
मागील दिवसापासून पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील ठाणे, डोंबिवली, कल्याण ते बदलापूर, भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात गुरूवारी सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू होता. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. शहरातील सखल भागात पाणी साचले होते. तसेच दिवा येथील खान कम्पाऊंड परिसरात सखल भागातही पाणी साचले होते.
शहरातील अनेक भागात वृक्ष कोसळल्याची घटना घडली. यामध्ये घोडबंदर रस्त्यावरील आनंदनगर परिसरात वृक्ष कोसळले. तर, वर्तकनगर परिसरात रस्त्यावरील एका चारचाकी वाहनांवर आणि कापूरबावडी परिसरातील रेवाळे तलाव परिसरातील दोन घरांवर वृक्ष कोसळले.
कल्याण डोंबिवलीत मुसळधार
कल्याण डोंबिवली परिसरात रात्रीपासून मुसळधार पाऊस होता. पावसामुळे रस्त्यावरील वाहतूक संथगतीने सुरू होती. कल्याण, डोंबिवली शहरात कुठेही पाणी तुंबणार नाही यासाठी पालिकेची प्रभागातील आपत्कालीन पथके कार्यरत होती. त्यामुळे शहरात पाणी तुंबल्याच्या घटना कमी असल्याचे दिसून आले. अशाचप्रकारे उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर परिसरातही पावसाचा जोर पाहायला मिळाला.
वाहतूक कोंडी
मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि अवेळी सुरू असलेली अवजड वाहतूक यामुळे ठाणे शहरात वाहतूक कोंडी होत आहे. अशातच, ठाणे आणि मुंबईच्या वेशीवर असलेल्या आनंदनगर नाक्यावरील रस्त्यावर दुरुस्ती कामासाठी मार्गरोधक लावण्यात आले आहेत. यामुळे मार्ग निमुळता झाल्याने गुरुवारी सकाळी ठाणे आणि मुंबई शहराच्या वेशीवर वाहतूक कोंडी झाली. त्याचा फटका कामावर निघालेल्या नोकरदार वर्गाला बसला.
रेल्वे गाड्या उशिराने
गुरूवारी तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतुक पाऊण तास उशिराने सुरू होती. यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.