Maharashtra Latest Marathi News: करोना रूपी संकट दूर झाल्यानंतर दोन वर्षांनी राज्यात काल ढोल-ताशांच्या गजरात आणि जल्लोषात गणरायाचे आगमन झाले. नागरिकांनी मोठ्या उत्साहात लाडक्या बाप्पाचे स्वागत केले. त्यानंतर आज राज्यात अनेक ठिकाणी दीड दिवसांच्या गणरायाल निरोप देखील दिला जाणार आहे. याशिवाय, काल गणरायाच्या आगमनासोबतच वरूण राजाने देखील पुनरागमन केले होते. आजही राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
दुसरीकडे राज्यातील राजकीय रणधुमाळी सुरूच आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे नेते विविध मुद्य्यांवरून एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करत आहेत. सणासुदीचा काळ सुरू असताना विविध घडामोडी घडताना दिसत आहेत.
पाहूया याशिवाय महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि कलाविषयक घडामोडींचा आढावा एकाच ठिकाणी…
Maharashtra News Live पाहूया याशिवाय महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि कलाविषयक घडामोडींचा आढावा एकाच ठिकाणी…
देशभरात गणेशोत्सवाला कालपासून सुरुवात झाली आहे.त्यामध्ये पुणे शहराच्या गणेशोत्सवाची एक वेगळीच ओळख असून त्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले आणि आमदार विश्वजीत कदम यांनी मानाचा पहिला कसबा गणपतीच दर्शन घेतले.यावेळी त्यांच्या हस्ते आरती देखील केली. सविस्तर वाचा…
बीडीडी चाळ पुनर्विकासाअंतर्गत २२५० (आजी-माजी) पोलिसांनी १५ लाख रुपयात घरे देण्याचा निर्णय शासनाने नुकताच जाहीर केला असून आता पहिल्या टप्प्यातील पोलिसांची घरे रिकामी करून घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे लवकरच म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून पोलिसांना करारनामा देण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.
कर्णधार रोहित शर्मा पाठोपाठ भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर अलिबागमध्ये जमीन खरेदी केली आहे. झिराड परिसरात ही ८ एकर हवेशीर जागा असून येथे तो फार्महाऊस बांधणार आहे. विराटचा भाऊ विकास कोहली याने हा व्यवहार गणपतीच्या आदल्या दिवशी मंगळवारी (३० ऑगस्ट) पूर्ण केला.
शेताच्या बांधावर बैल चारण्यातून झालेल्या वादात एका महिलेवर बलात्कार करून तिची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना धारणी तालुक्यातील एका गावात घडली. याप्रकरणी मृत महिलेच्या पतीच्या तक्रारीवरून धारणी पोलिसांनी आरोपीला अटक केली. सचिन ऊर्फ रम्मू शिवलाल दारसिंभे (२६) असे आरोपीचे नाव आहे.
‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेतील पहिल्या मेट्रो गाडीच्या चाचणीला मंगळवारी सुरुवात झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांनी मंगळवारी ‘मेट्रो ३’च्या पहिल्या गाडीच्या चाचणीला हिरवा झेंडा दाखवला आणि भुयारी मेट्रो धावली. यावेळी बोलताना फडणवीस यांनी तत्कालीन ठाकरे सरकारला लक्ष्य केले होते. वाचा सविस्तर बातमी...
जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायतपैकी एक असलेल्या डोनगावच्या ( ता. मेहकर) ग्रामविकास अधिकारी आणि महिला सरपंच यांच्यातील भ्रष्टाचाराचे खुले समर्थन करणारी एक चित्रफित सध्या समाज माध्यमांवर सार्वत्रिक झाली आहे. 'खाणे' तर आपला अधिकारच, मतदार चोरच आहे, असा सल्ला ते महिला सरपंचाला देत असल्याचे त्यात दिसत आहे.
मुलाच्या हव्यासातून पत्नीचा गळा आवळून खूनाचा प्रयत्न केल्यानंतर बेशुध्द झालेल्या पत्नीला आटपाडीजवळ डोगरात फेकून देण्याचा धक्कादायक प्रकार आटपाडी तालुक्यात उघडकीस आला. जखमी महिलेला गावकर्यांच्या मदतीने रूग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलीसांनी तातडीने हालचाली करून पतीसह दोघांना गुरूवारी मुंबईमध्ये अटक केली.
मुंबईतील घरविक्रीत जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्टमध्ये मोठी घट झाली आहे. मुंबईत या महिन्याभरात ८५५२ घरांची विक्री झाली असून यात मुद्रांक शुल्काच्या रूपाने ६४३ कोटी रुपयांचा महसूल राज्य सरकारला मिळाला आहे.नोंदणी व मुद्रांक विभागाच्या आकडेवारीनुसार ऑगस्टमध्ये मुंबईत ८५५२ घरांची विक्री झाली आहे. सविस्तर वाचा…
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील महा-ई-सेवा केंद्रांकडून विद्यार्थी, नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत असल्याची तक्रार भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे केली आहे. दोषी केंद्रचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी जगतापांनी केली आहे. सविस्तर वाचा…
विविध गुन्ह्यांत शिक्षा भोगत असलेल्या आरोपींना बनावट कागदपत्रांच्या आधारे जामीन मिळवून देणाऱ्या टोळीला कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांनी बुधवारी अटक केली. आरोपींन मध्ये एक तरुण आणि तीन तरुणींचा समावेश आहे. या टोळीला बोगस कागदपत्रे तयार करून देणाऱ्या इतर दोन आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. सविस्तर वाचा…
पडघे येथून नालासोपारा येथे येणारी मुख्य २२० के.व्ही. उच्चदाब वहिनी तांत्रिक कारणामुळे बंद आहे. त्यामुळे नालासोपारा भागातील वीजपुरवठा अंदाजे सायंकाळी ५ ते ६ वाजेपर्यंत सुरू होईल. महापारेषणचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. पावसाचे पाणी चहूबाजूंनी असल्यामुळे तात्काळ काम होण्यास विलंब होत आहे.
मुंबई पोलिसांतील वरिष्ठ निरीक्षक अरुण खानविलकर यांची भ्रष्टाचाराच्या आरोपातून उच्च न्यायालयाने १२ वर्षांनंतर निर्दोष सुटका केली. खानविलकर हे राज्य दहशतवाद विरोधी पथकात (एटीएस) कार्यरत होते व २०१० मध्ये भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक होण्यापूर्वी ते मालेगाव २००८ बॉम्बस्फोट प्रकरण, औरंगाबाद शस्त्रसाठा प्रकरण, २००६ सालच्या उपनगरीय रेल्वेतील साखळी बॉम्बस्फोटांसारख्या संवेदनशील प्रकरणांचा तपास करणाऱ्या पथकाचा भाग होते. सविस्तर वाचा…
शिंदे समर्थक रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना केवळ तीनदाच मंत्रालयात आले. त्यामुळे त्यांची अगदी गिनीज बुकमध्ये नोंद झाली, असा टोला त्यांनी लगावला आहे. वाचा सविस्तर बातमी...
शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कोणत्या उपाययोजना राबविण्यात याव्या. विविध पिकांविषयी मार्गदर्शन करण्यासाठी राज्य शासनातर्फे माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत जिल्हा स्तरावरील सर्व अधिकारी शेतकऱ्यांना भेटून त्यांच्याशी संवाद साधणार आहे. सविस्तर वाचा…
चिंचवडमध्ये मद्यपान केलेला व्यक्ती साडीने पाचव्या मजल्यावरून खाली उतरत असताना त्याचा खाली कोसळून मृत्यू झाला आहे. ही घटना निगडी ओटास्कीम येथे बुधवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अनिल सुदाम कांबळे वय- ५० अस मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सविस्तर वाचा…
महापालिका बरखास्त झाली आणि एकूणच शहरातील नागरिकांशी संबंधित समस्यांचा गुंता उकलणे थांबले की काय अशी पऱिस्थिती गेल्या पाच महिन्यात निर्माण झाली आहे. प्रशासक नेमण्यापूर्वी किती नगरसेवक नागरी समस्यांची जाणीव असणारे होते हे सांगणे कठीणच. पण, किमान त्यांनी फोन केला तर अधिकारी, कर्मचारी समस्यांच्या सोडवणुकीसाठी समोर तरी यायचे. सविस्तर वाचा…
कळव्यामध्ये दिड दिवसाच्या गणपतीच्या दर्शनाकरिता काही जणांच्या घरी तसेच सोसायट्यांमध्ये फिरत असताना लोक फक्त एकच मुद्दा मांडत होते. काहीही करा पण वातानुकूलित लोकल बंद करा. त्यामुळे या लढ्याच रुप मला आता वर्ग संघर्षाच्या लढ्यासारख दिसत असल्याचे मत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट द्वारे व्यक्त केले आहे. सविस्तर वाचा…
“महाराष्ट्रातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ बंद केले पाहिजेत, २० वर्षांपूर्वीच खरंतर हे बंद व्हायला हवे होते. त्याऐवजी दुसरे कोणते मतदारसंघ पाहिजेत, याचा सर्वांनी मिळून विचार करावा. मी जबाबदारीने सांगतोय की शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील बहुतांश आमदार हे शिक्षकांना खोटा पाठिंबा देतात. जे आमच्या पिढ्या बरबाद व्हायला कारणीभूत ठरतील. असं आमदार प्रशांत बंब यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं आहे. वाचा सविस्तर बातमी...
उद्योजक रतन टाटा यांनी उद्योगक्षेत्रासाठी मध्यस्थाचे काम करणाऱ्या निरा राडिया यांच्याशी संबंधित ऑडिओ लीकप्रकरणी केलेल्या चौकशीच्या मागणीप्रकरणी याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. २०१० मधील या प्रकरणावर तब्बल आठ वर्षांनी सुनावणी होत आहे. ही ऑडिओ क्लिप लीक झाल्यानंतर प्रसारमाध्यमांना उपलब्ध झाली होती. या प्रकरणी सरकारचा चौकशी अहवाल समाधानकारक नसल्याचे ताशेरे सर्वोच्च न्यायालयाने ओढले होते.
ठाणे : मत्सपालन व्यवसायात गुंतवणुक केल्यास आकर्षक परताव्याचे अमिष दाखवून १३ गुंतवणूकदारांची एक कोटीहून अधिक रुपयांची फसवणुक करणाऱ्या त्रिकुटाला ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली असून त्यांच्या एका साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत. बातमी वाचा सविस्तर...
पोर्तुगालमध्ये एका भारतीय महिलेच्या मृत्यूनंतर खळबळ माजली आहे. इतकंच नाही, तर महिलेच्या मृत्यूनंतर पोर्तुगालच्या आरोग्यमंत्री मार्टा टेमिडो यांना आपलं मंत्रीपद गमवावं लागलं आहे. त्यांनी राजीनामा दिला असून, पंतप्रधानांनी तो स्वीकारला आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, लिस्बन येथे हृदयविकाराचा झटका आलेल्या ३४ वर्षीय भारतीय महिलेचा रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्यान दुसऱ्या रुग्णालयात नेलं जात असताना मृत्यू झाला.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी यांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. पाकिस्तानमध्ये पुरामुळे मोठं संकट आलं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पुरामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पाकिस्तान भीषण संकटाचा सामना करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत शोक व्यक्त केला होता. यानंतर शाहबाज शरीफ यांनी त्यांचे आभार मानले असून, आपला देश या संकटावर मात करेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
शहरात झालेल्या पावसामुळे १४ ठिकाणी झाडे कोसळली. मध्यरात्री पुणे स्टेशन, अलंकार टॉकीज येथे मोठे झाड कोसळले. पहाटे बिबवेवाडी, झाला कॉम्प्लेक्स येथे झाड पडून एमएनजीएलची गॅस वाहिनी तुटली असून कोणीही जखमी झाले नाही. वाचा सविस्तर बातमी...
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, दरवर्षी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना आपण आवर्जून त्याला पुढल्या वर्षी लवकर यायला सांगतो. त्यानंतर पुढचे वर्षभर आपण बाप्पांची तितक्याच आतुरतेनं वाट पाहत असतो. आज दीड दिवसाचे गणराय पुन्हा त्यांच्या घरी जाण्यासाठी निघतील तेव्हा ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ या घोषणा नक्कीच ऐकायला मिळतील. वाचा सविस्तर बातमी...
कल्याण पश्चिम येथील रामबाग विभागात विजय तरुण गणेशोत्सव मंडळाने दोन महिन्यापूर्वी शिवसेनेत घडलेल्या बंडखोरी नंतर राज्यात सत्ता स्थापन झालेल्या घडामोडींवर चलतचित्रद्वारे “मी शिवसेना बोलते’ असा देखावा उभा केला होता. या देखाव्यामुळे कायदा, शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशी शक्यता वर्तवून पोलिसांनी आक्षेप घेत या देखाव्यावर बुधवारी पहाटे चलचित्र देखाव्याचे साहित्य जप्त केले. मखरात गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा होण्यापूर्वीच पोलिसांनी कारवाई केल्यामुळे शिवसैनिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. वाचा सविस्तर बातमी...
‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, दरवर्षी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना आपण आवर्जून त्याला पुढल्या वर्षी लवकर यायला सांगतो. त्यानंतर पुढचे वर्षभर आपण बाप्पांची तितक्याच आतुरतेनं वाट पाहत असतो. आज दीड दिवसाचे गणराय पुन्हा त्यांच्या घरी जाण्यासाठी निघतील तेव्हा ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ या घोषणा नक्कीच ऐकायला मिळतील.