सातारा : सातारा जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी रणजितसिंह देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्राद्वारे आणि ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विट करीत ही नियुक्ती आज जाहीर केली. सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे अध्यक्षपदाच्या रिक्त जागेच्या नियुक्तीसाठी हालचाली गतिमान झाल्या होत्या. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यातील चर्चेतून देशमुख यांचे नाव पुढे आले, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, आमदार विश्वजित कदम यांनीही त्यांच्या नावाला पाठिंबा दिल्याने देशमुख यांची नियुक्ती एकमताने जाहीर करण्यात आली.

श्री देशमुख यांनी यापूर्वी जिल्हा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. दुष्काळी परिस्थितीत पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांचा माण व खटाव तालुक्यांचा दौरा घडवून शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा गतिमान करण्याचा प्रयत्न केला होता. पुणे येथील प्रसिद्ध आय.एल.एस विधी महाविद्यालयातून त्यांनी कायद्याची पदवी संपादन केली असून पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी प्रतिनिधी म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. वडील दिवंगत धैर्यशीलराव देशमुख हे खटाव तालुक्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देशमुख यांच्या या नियुक्तीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, आमदार सतेज पाटील, आमदार विश्वजित कदम, प्रदेश चिटणीस राजेंद्र शेलार, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अजितराव पाटील चिखलीकर, प्रदेश युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष शिवराज मोरे, माजी जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, बाबासाहेब कदम, ॲड. विजयराव कणसे, अच्युतराव खलाटे, मनोहर शिंदे, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख, झाकीर पठाण, सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्वागत करून अभिनंदन केले आहे.