मुंबई : अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत देशभरातील १,३०९ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येत आहे. त्यात राज्यातील १०३ रेल्वे स्थानकांची निवड करण्यात आली आहे. मात्र राज्यातील कोकण रेल्वे मार्गावरील एकाही स्थानकाची निवड करण्यात आलेली नाही. त्यामुळे केंद्र सरकार, राज्य सरकार, रेल्वे मंडळाने कोकणातील प्रवाशांना आणि रेल्वे स्थानकांना अमृत भारत स्थानक योजनेपासून वंचित ठेवले. कोकण रेल्वेवरील गोव्यातील आणि कर्नाटकातील प्रत्येकी एका स्थानकाला अमृत भारत स्थानक योजनेत समाविष्ट केले आहे.
कोकण रेल्वेमार्गावरील प्रवाशांचा प्रवास अवेळी होतो. त्यात कोकणातील रेल्वे स्थानकावर पायाभूत सुविधांची वानवा असल्याने प्रवाशांची गैरसोय होते. कोकण रेल्वे मार्गावरील इंदापूर, गोरेगाव रोड, सापे-वामणे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, अंजनी, कामथे, कडवई, निवसर, वेरवली, खारेपाटण रोड येथे पुरेशा उंचीचे फलाट नाहीत. मूलभूत सुविधा नसल्यामुळे चढ-उतार करताना प्रवाशांना त्रास होतो. पडून इजा होते.
रेल्वे मंडळाच्या नियमानुसार फलाट व पादचारी पूल या किमान मूलभूत आवश्यक सुविधा असूनही कोकण रेल्वेमार्गावर केवळ निधीअभावी त्या सर्व ठिकाणी देणे शक्य झालेले नाही. दिवाणखवटी स्थानकात गेल्या साधारण ३० वर्षांपासून फलाट बांधलेला नाही. कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत अद्याप विलीनीकरण झाले नाही. त्यामुळे प्रवाशांना या समस्या भेडसावत आहेत. तसेच विलीनीकरण न झाल्याने राज्यातील कोकण रेल्वेवरील स्थानके दुर्लक्षित आहेत.
कोकण रेल्वेच्या उभारणीत इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक आर्थिक सहभाग उचलणाऱ्या महाराष्ट्रातील एकही स्थानक केंद्र शासनाच्या अमृत भारत योजनेत नसणे हे दुर्दैवी आणि संतापजनक आहे. महाराष्ट्रातून कोकण रेल्वेला सर्वाधिक महसूल मिळतो. कोकण रेल्वेच्या स्थापनेपासून स्वतंत्र रेल्वेगाड्या, लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांना थांबे याबाबतीत दुजाभाव सहन केल्यानंतर आता अमृत भारत योजनेतही महाराष्ट्राला सावत्र वागणूक मिळत असताना आता स्वस्थ बसू शकत नाही. याबाबत सर्व प्रवासी संघटनांनी संबंधित लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा यापूर्वी सुरू केला आहे. तसेच कोकणात अमृत भारत योजना लागू करताना त्यात इतर सुशोभीकरणाची सर्व स्थानकांवर २४ डब्यांची रेल्वेगाडी उभी राहू शकेल, एवढे लांब फलाट, संपूर्ण फलाटावर छप्पर, पादचारी पूल व त्यावरही छप्पर आणि उद्वाहक यांचा प्राधान्याने समावेश करावा, अशी मागणी आहे. तसेच याबाबत स्थानकाचे उत्पन्न हा निकष न लावता अतिपर्जन्यमानाचा प्रदेश म्हणून सरसकट सर्वच स्थानकांवर ही सोय उपलब्ध करून द्यावी, अशी प्रतिक्रिया अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे सचिव अक्षय महापदी यांनी दिली.
कोकण रेल्वेवरील दोन रेल्वे स्थानके नियोजित
अमृत भारत स्थानक योजनेत कोकण रेल्वेवरील मडगाव आणि उडुपी स्थानके नियोजित आहेत. मडगाव रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी ३४८.५० कोटी रुपये आणि उडुपी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी ८७.५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.