BJP Share Post on Operation Blue Star : पहलगाम येथील दहशतवादी हल्ला, भारतीय सैन्यदलाने राबविलेले ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर झालेल्या युद्धविरामावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झाडल्या जात असताना भाजपाने १ जून २०२५ रोजी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवरून एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पंजाबमध्ये राबविलेल्या ऑपरेशन ब्लू स्टारचा उल्लेख करण्यात आला होता. परंतु, या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाल्यानंतर काही तासानंतरच भाजपाकडून ती हटविण्यात आली. दरम्यान, या पोस्टमध्ये नेमकं काय होतं? भाजपाने ती हटविण्याचा निर्णय का घेतला? याबाबत सविस्तर जाणून घेऊ…

३१ मे १९८४ मध्ये अमृतसरच्या प्रसिद्ध सुवर्णमंदिरावर भिंद्रनवालेने संपूर्णपणे कब्जा केला होता. त्यावेळी केंद्रात पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारची सत्ता होती. भिंद्रनवालेच्या सरकारविरोधातील बंडामुळे पंजाबमधील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली होती. अनेक ठिकाणी उसळलेल्या हिंसाचारामध्ये शेकडो निष्पाप लोकांना आपले प्राण गमावावे लागले होते. दरम्यान, पंजाबमधली परिस्थिती संपूर्णपणे हाताच्या बाहेर जात असल्याचं लक्षात आल्यानंतर इंदिरा गांधींनी १ जून १९८४ रोजी राज्याचं संपूर्ण प्रशासन लष्कराच्या ताब्यात दिलं. भारतीय लष्कराने ऑपरेशन ब्लू स्टार राबवित ७ जून रोजी भिंद्रावालेचा खात्मा केला. मात्र, या मोहिमेत भारतीय लष्कराचे ८३ जवान शहीद आणि २४८ सैनिक जखमी झाले. याशिवाय ४९२ निष्पाप लोकांचा मृत्यूही झाला.

भाजपाने पोस्टमध्ये काय म्हटलं होतं?

  • १ जून २०२५ रोजी ऑपरेशन ब्लू स्टारला ४० वर्षं पूर्ण झाल्यानंतर भाजपाने आपल्या अधिकृत फेसबुक अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली.
  • या पोस्टमध्ये भाजपाने ऑपरेशन ब्लू स्टार दरम्यान मृत्युमुखी पडलेल्या सर्व लोकांना शहीद अशी उपमा दिली.
  • विशेष बाब म्हणजे, गेल्या ४० वर्षांच्या काळात पहिल्यांदाच भाजपाकडून अशा प्रकारचा उल्लेख करण्यात आला होता. भाजपाने केलेली पोस्ट ही पंजाबी भाषेत होती.
  • भाजपाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये असं म्हटलं होतं की, काँग्रेस सरकारने दरबार साहिबवर केलेल्या हल्ल्याच्या पहिल्या दिवशी प्राण गमावलेल्या सर्व शहीदांना श्रद्धांजली.
  • या पोस्टबरोबर भाजपाने काही फोटोही शेअर केले होते. त्यात सुवर्ण मंदिराच्या आवारात भारतीय लष्कराचे रणगाडे आणि ऑपरेशन ब्लू स्टारमध्ये नुकसान झालेल्या अकाली तख्ताचे फोटो होते. अकाली तख्त हे शीख धर्मातील सर्वोच्च धर्मिक केंद्र मानले जाते.
operation blue star in amritsar punjab (indian express photo)
पंजाबच्या अमृतसर येथील शीखांचे पवित्र स्थान सुवर्ण मंदिर (फोटो सौजन्य इंडियन एक्स्प्रेस)

आणखी वाचा : Operation Sindoor : “अमेरिकेतून फोन आला अन् पंतप्रधान मोदींनी शरणागती पत्करली”, राहुल गांधी नेमकं काय म्हणाले?

ऑपरेशन ब्लू स्टारच्या बाबतीत सावध पवित्रा

भाजपाने नेहमीच ऑपरेशन ब्लू स्टारच्या बाबतीत सावध पवित्रा घेतलेला आहे. कारण, एकीकडे त्यांना एनडीएमधील पूर्वीचा घटकपक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलाच्या भावना सांभाळाव्या लागतात, तर दुसरीकडे पक्षाच्या राष्ट्रवादी व हिंदुत्ववादी भूमिकाही भाजपाला जपावी लागते. यापार्श्वभूमीवर ऑपरेशन ब्लू स्टारचा उल्लेख करून त्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांना शहीदाची उपमा देण्याची भाजपाची भूमिका लक्षवेधी ठरते. दरम्यान, या हटवलेल्या पोस्टला फारसा अर्थ लावू नये, असे म्हणत भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्याने द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, पक्षाने शेअर केलेल्या पोस्टचा उद्देश केवळ भारताच्या इतिहासातील वेदनादायी गोष्टींची आठवण करून देण्याचा होता.

पोस्ट हटविल्यानंतर भाजपाचे नेते काय म्हणाले?

पंजाबमधील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड म्हणाले की, लोकांनी या प्रकरणात पोस्टमधील शब्दांपेक्षा पक्षाच्या भावनेकडे लक्ष द्यावे. १९८४ च्या दंगलीतील पीडितांच्या जखमांवर फुंकर घालण्याच्या आमच्या हेतूकडे पाहिले पाहिजे. यावेळी जाखड यांनी शीखविरोधी दंगलीतील पीडितांसाठी तत्कालीन दिल्लीतील भाजपा सरकारने घेतलेल्या भूमिकेकडेही लक्ष वेधले. ही दंगल इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर उसळली होती. आमच्या पक्षाची कृती ही शब्दांपेक्षा मोठी असते, असे म्हणत सुनील जाखड यांनी सांगितले, “मागच्या आठवड्यातच दिल्लीचे मुख्यमंत्र्यांनी १९८४ च्या दंगलीतील पीडितांच्या १२५ नातेवाइकांना नोकऱ्या दिल्या.”

दरम्यान, ऑपरेशन ब्लू स्टार संदर्भात केलेली पोस्ट का हटविण्यात आली? असा प्रश्न माध्यमांनी जाखड यांना विचारला. त्यावर उत्तर देताना, “कधी कधी सोशल मीडियावरील टीम पक्षाच्या नेतृत्त्वाची योग्य मान्यता न घेताच मजकूर पोस्ट करीत असते. कदाचित त्या पोस्टमध्ये काही सुधारणा करण्याची गरज होती. मात्र, पक्षाचा एकूण उद्देश काय होता, याकडेच लक्ष केंद्रित करायला हवं.” असं जाखड यांनी स्पष्ट केलं. इंदिरा गांधी यांनी राबविलेल्या ऑपरेशन ब्लू स्टारचं त्यावेळी भाजपाने समर्थन केलं असलं तरी त्यांनी काँग्रेस सरकारच्या भूमिकेवर सातत्याने टीका केली आहे. काँग्रेस सरकारच्या अपयशामुळेच तशी परिस्थिती निर्माण झाली होती, असा आरोप भाजपाकडून आजही केला जातो.

ऑपरेशन ब्लू स्टारबाबत भाजपाची भूमिका काय होती?

भाजपाचे दिवंगत नेते अरुण जेटली यांनी २००९ मध्ये जालंधरमधील पत्रकार परिषदेत ऑपरेशन ब्लू स्टारला ऐतिहासिक चूक असं म्हटलं होतं. ऑगस्ट २०२३ मध्ये, संसदेत सरकारविरुद्ध आणलेल्या अविश्वास ठरावावरील चर्चेत विरोधकांना उत्तर देताना पंतप्रधान मोदींनी ऑपरेशन ब्लू स्टारला अकाल तख्तावर झालेला हल्ला असं संबोधलं होतं. तत्कालीन काँग्रेस सरकारवर टीका करताना पंतप्रधानांनी ऑपरेशन ब्लू स्टारची तुलना १९६६ मध्ये मिझोरामवर भारतीय हवाई दलाने केलेल्या बॉम्ब हल्ल्याशी केली होती. काँग्रेस सरकारला मिझोरामपासूनच अशा कारवायांची सवय झाली होती आणि त्याच मानसिकतेतून अकाल तख्तावर हल्ला करण्यात आला होता, असं पंतप्रधान मोदी म्हणाले होते.

हेही वाचा : ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचं आक्षेपार्ह विधान; भाजपा आक्रमक, नेमके काय म्हणाले भगवंत मान?

भाजपाने ती पोस्ट आताच का केली?

भाजपाने ऑपरेशन ब्लू स्टार संदर्भात सोशल मीडियावर केलेली पोस्ट ही लुधियाना पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीशी जोडली जात आहे. या जागेवर आम आदमी पार्टीने राज्यसभा खासदार संजीव अरोरा यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात भाजपाने जीवन गुप्ता यांना मैदानात उतरवलं आहे. जर या जागेवर आपच्या उमेदवाराचा विजय झाला तर राज्यसभेची जागा खाली होईल आणि अरविंद केजरीवाल यांना खासदारकी मिळेल, अशी भाजपाला भीती आहे. पंजाबमध्ये भाजपाने हिंदू मतांमध्ये काही प्रमाणात वाढ केली असली, तरी त्यांना शीख समाजाचा पाठिंबा मिळणे आवश्यक आहे. त्यामुळेच भाजपाने ऑपरेशन ब्लू स्टारमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांसाठी पोस्ट केली होती, असा अंदाज राजकीय विश्लेषक काढत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अकाली दलाकडून भाजपावर टीका

दरम्यान, पंजाबमधील १९८४ दंगल पीडित कल्याण संघटनेचे अध्यक्ष सुरजीत सिंह यांनी भाजपा सरकारच्या प्रयत्नांचे कौतुक केलं आहे. मात्र, भाजपाने १ जून रोजी पोस्ट करून ती तातडीने हटवली? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. “कदाचित त्यांनी ही पोस्ट लुधियाना पश्चिम पोटनिवडणुकीचा विचार करून केली असेल, सर्व समाजांच्या मतदारांना अपील करण्याचा त्यामागे उद्देश असावा. प्रत्येक पक्ष निवडणुकांच्या वेळी अशा प्रकारच्या रणनीती वापरतोच,” असं सुरजीत सिंह यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे अकाली दलाचे प्रवक्ते दलजीत सिंह चीमा यांनी भाजपावर टीका केली आहे. “ऑपरेशन ब्लू स्टारमध्ये मृत्युमुखी पडलेल्या लोकांसाठी भाजपाने आधी सोशल मीडियावर पोस्ट केली आणि नंतर ती काढून का टाकली? असा प्रश्न दलजीत सिंह यांनी विचारला आहे.