नागपूर : नागपूर जिल्हा वकील संघटनेच्यावतीने काल, शुक्रवारी सिव्हिल लाईन्स जिल्हा न्यायालय परिसरात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. कार्यक्रमात सरन्यायाधीश भूषण गवई यांनी न्यायालयीन सक्रियतेवर अतिशय महत्त्वपूर्ण भाष्य केले. सत्कार सोहळ्यात मंचावर सर्वोच्च न्यायालयाचे न्या. दीपांकर दत्ता, न्या. प्रसन्ना वराळे, न्या.अतुल चांदूरकर, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराध्ये, नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्या. नितीन सांबरे, न्या. अनिल किलोर, न्या. अभय मंत्री, प्रमुख जिल्हा न्यायाधीश दिनेश सुराणा आणि गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई आणि पत्नी तेजस्विनी गवई उपस्थित होत्या.
काय म्हणाले गवई?
न्यायिक सक्रियता कायम राहावी, या मताचा आहे, मात्र संविधानाने कार्यपालिका, विधीमंडळ, न्यायपालिकेला सीमा आखून दिल्या आहेत. त्यामुळे न्यायपालिकेने प्रत्येक बाबीमध्ये हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही, असे परखड मत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केले. सीमा आखून दिल्या आहेत. त्यामुळे न्यायपालिकेने प्रत्येक बाबीमध्ये हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही, असे परखड मत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केले. न्या.गवई पुढे म्हणाले, राज्यघटनेनुसार सर्व संस्थांनी काम करणे अपेक्षित आहे. न्यायपालिकेची सक्रियता हे संवैधानिक मूल्ये टिकविण्यासाठी गरजेचे आहे. मात्र याचे रुपांतर दुसऱ्या कोणत्या बाबीमध्ये होऊ नये.
यावेळी गवई यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती बनण्यापूर्वीचा किस्सा सांगितला. न्यायमूर्ती बनण्यात दोन-तीन वर्षाचा विलंब झाल्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात वकीली सुरू करण्याचा विचार केला होता. मात्र वकीलांनी यासाठी नकार दिला. वकील बनशील तर केवळ पैसे कमावशील, न्यायमूर्ती झाला तर आंबेडकरांनी सांगितलेल्या सामाजिक न्यायासाठी काम करता येईल. या सल्ल्यामुळे ते आज सरन्यायाधीशपदापर्यंत पोहोचू शकले असल्याची आठवण न्या.गवईंनी ताजी केली.
न्या. दीपांकर दत्ता यांनी सरन्यायाधीश पदी गवई यांची नेमणूक अभिमानाची बाब असल्याची भावना व्यक्त केली. न्या. गवई त्यांच्या कार्यकाळात न्याय क्षेत्राला नव्या उंचीवर नेतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. न्या. आलोक आराध्ये म्हणाले, ‘गवई यांच्या निर्णयाचे परीघ फार विस्तीर्ण आहे. टायगर कॉरिडॉर ते बुलडोझर जस्टिस असे अनेक लोकहिताचे निर्णय न्या. गवई यांच्या निर्णयातून दिसून येतात.’ न्या. अतुल चांदूरकर यांनी सांगितले, नागपूर जिल्हा वकील संघटनेचा दीडशे वर्षांचा गौरवशाली इतिहास राहिलेला आहे. संघटनेच्या या प्रवासात न्या. गवई यांचे अमूल्य योगदान आहे. विधी क्षेत्राच्या हितासाठी त्यांनी सातत्याने कार्य केले.
सर्वोच्च न्यायालयाचे न्या. प्रसन्ना वराळे यांनी नागपूरचा रक्तिविहीन क्रांतीची भूमी म्हणून उल्लेख केला. डॉ. आंबेडकर यांनी या क्रांतीच्या माध्यमातून दिलेल्या तथागत बुद्धाच्या धम्मातील प्रज्ञा आणि करुणा न्या. गवई यांच्या व्यक्तिमत्वातून प्रतिबिंबित होते, असे न्या. वराळे म्हणाले.
जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. रोशन बागडे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमात न्या. गवई यांच्या हस्ते जिल्हा न्यायालयाच्या विस्तारित इमारतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राचे तसेच संविधान उद्देशिकेचे उद्घाटन करण्यात आले. याशिवाय नवनिर्मित संगणीकृत ग्रंथालय व कार्यालयाचे देखील उद्घाटन पार पडले. सूत्रसंचालन ॲड. शाद मिर्झा आणि ॲड. उषा माणिकपुरे (गुजर) यांनी केले.