नागपूर : राज्यात जून महिन्याच्या मध्यान्हानंतरच मोसमी पाऊस परत पुढे सरकण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने जुनच्या तिसऱ्या आठवड्यात पूर्व आणि मध्य भारतात तो वेगाने पुढे सरकेल.
संपूर्ण महाराष्ट्रात मोसमी पावसाची स्थिती ही एक ते १४ जूनपर्यंत फारशी चांगली नाही. मात्र, १५ ते ३० जूनमध्ये पहिल्या जूनच्या पहिल्या दोन आठवड्यापेक्षा मोसमी पाऊस चांगला असेल, असा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी दिला आहे. दरम्यान, विदर्भातील कमाल तापमानात येत्या दिवसात आणखी वाढ होणार असून १३ ते १४ जूनपर्यंत उकाडा कायम राहील, असाही अंदाज आहे.
महाराष्ट्रात मोसमी पावसाची प्रगती अजूनही रखडलेलीच आहे. महाराष्ट्रात साधारण २५, २६ मे पासून तर पूर्व भारतात २९ मे पासूनच मोसमी पाऊस रखडलेला आहे. कोरड्या वाऱ्यांमुळे मोसमी पावसाचे वारे कमकुवत झाले आहेत. हवी तितकी आर्द्रता ते आणत नसल्यामुळे संपूर्ण भारतातच मोसमी पाऊस रखडला आहे.
मोसमी पावसाचे वारे इतके कमकुवत झाले आहेत की ते भारतात योग्यरित्या प्रवेश करत नाही आहेत. मोसमी पावसात जेव्हा खंड पडतो, तेव्हा अशीच स्थिती असते. पूर्व विदर्भात ४५ अंश सेल्सिअअसच्या आसपास कमाल तापमान जाण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने नागपूर, वर्धा, अकोला, चंद्रपूर सारख्या शहरांमध्ये देखील कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअसपेक्षा अधीक राहील.
मराठवाड्यात देखील ४० अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान राहण्याची शक्यता आहे. विशेषकरुन विदर्भाच्या जवळ असणाऱ्या प्रदेशात ही स्थिती राहील. जळगावसारख्या शहरांमध्ये देखील तापमान ४० अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात १२ जूनपर्यंत तरी पडणारा पाऊस हा दुपारनंतर पडणारा आणि विखुरलेल्या स्वरुपातील पाऊस असेल.
मात्र, १५ जूनपर्यंत तरी मोसमी पाऊस अपेक्षीत नाही. राज्याच्या पश्चिम किनाऱ्यावर काही प्रमाणात पाऊस राहील. या कालावधीत कोरडवाहू शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई केली, तर नुकसान होण्याचीच शक्यता अधिक आहे. कारण पुन्हा एकदा मोठी तापमानवाढ पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ही तापमानवाढ आणि पावसाचे गणीत बघता शेतकऱ्यांनी तरी पेरणीची घाई करु नये. अन्यथा नुकसान होण्याचीच शक्यता आहे, असाही सल्ला हवामान अभ्यासकांनी दिला आहे.
पश्चिम रशियावर अधिक दाबाचा पट्टा तयार झाला. त्यामुळे एकूणच वाऱ्याची दिशा बदलली. त्यामुळे पाकीस्तान, अफगाणिस्तान या मध्यपूर्वसारख्या देशातून कोरडी हवा मे महिन्याच्या अखेरीस भारतात यायला लागली. ही कोरडी हवा आता भारतातील बऱ्याच भागात पसरली असल्यामुळे मोसमी पाऊस थांबला आहे. कारण हवा कोरडी असेल तर पावसाचे ढग बरोबर तयार होऊ शकत नाहीत. नुसते उथळ ढग तयार होतात आणि तितका पाऊस पडत नाही. – डॉ. अक्षय देवरस, संशोधन शास्त्रज्ञ, नॅशनल सेंटर फॉर ॲटमाॅस्फेरिक सायन्स, युके