पुणे : घरांच्या वाढत्या किमती, ऑपरेशन सिंदूर आणि इराण-इस्राईल युद्धामुळे निर्माण झालेला भूराजकीय तणाव याचा परिणाम घरांच्या विक्रीवर झालेला आहे. देशातील सात महानगरांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा एप्रिल ते जून या तिमाहीत घरांच्या विक्रीत २० टक्के घट झाली आहे. मुंबईत ही घट २५ टक्के, तर पुण्यात २७ टक्के आहे.
अनारॉक ग्रुपने देशातील मालमत्ता क्षेत्राचा अहवाल जाहीर केला आहे. यात मुंबई, पुणे, दिल्ली, हैदराबाद, बंगळुरू, चेन्नई आणि कोलकता या महानगरांचा समावेश आहे. या अहवालानुसार, देशातील सात महानगरांत यंदा दुसऱ्या तिमाहीत ९६ हजार २८५ घरांची विक्री झाली. गेल्या वर्षी याच तिमाहीत ही विक्री १ लाख २० हजार ३३५ होती. त्या तुलनेत यंदा घरांच्या विक्रीत २० टक्के घट नोंदविण्यात आली आहे. यात केवळ चेन्नईचा अपवाद असून, तिथे घरांच्या विक्रीत ११ टक्के वाढ झाली आहे. देशात दुसऱ्या तिमाहीत झालेल्या एकूण घरांच्या विक्रीत मुंबई आणि पुण्याचा एकत्रित वाटा ४८ टक्के आहे.
घरांच्या विक्रीबरोबर नवीन घरांच्या पुरवठ्यातही घसरण झाली आहे. यंदा दुसऱ्या तिमाहीत सात महानगरांमध्ये ९८ हजार ६२५ नवीन घरांचा पुरवठा झाला. गेल्या वर्षी याच तिमाहीत तो १ लाख १७ हजार १६५ होता. त्यात यंदा १६ टक्के घट झाली आहे. यंदा दुसऱ्या तिमाहीत नवीन घरांच्या पुरवठ्यात मुंबईत सर्वाधिक ३६ टक्के घट झाली असून, त्या खालोखाल पुणे २५ टक्के, हैदराबाद १९ टक्के आणि बंगळूरु ४ टक्के अशी घट झाली आहे. चेन्नई, दिल्ली आणि कोलकत्यात नवीन घरांच्या पुरवठ्यात अनुक्रमे ६५, १० व १७ टक्के वाढ झाली आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
महानगरांतील घरांची विक्री
महानगर – एप्रिल ते जून २०२४ – एप्रिल ते जून २०२५
- मुंबई – ४१,५४० – ३१,२७५
- पुणे – २१,१४५ – १५,४१०
- दिल्ली – १६,५५० – १४,२५५
- बंगळुरू – १६,३५५ – १५,१२०
- हैदराबाद – १५,०८५ – ११,०४०
- चेन्नई – ५,१०० – ५,६६०
- कोलकाता – ४,५६० – ३,५२५
गेल्या वर्षीच्या तुलनेत घरांच्या विक्रीत यंदा ११ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. ही वाढ दिल्लीत सर्वाधिक २७ टक्के असून, बंगळुरूमध्येही १२ टक्के आहे. आगामी काळात घरांच्या किमती नियंत्रणात राहिल्यास महानगरांमध्ये घरांच्या मागणीत वाढ होईल. – अनुज पुरी, अध्यक्ष, अनारॉक ग्रुप.