वसई : मुंबई जवळील मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेतून प्रवासी खाली पडून दुर्घटना घडली होती. या दुर्घटने प्रकरणी आता मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता आशिष राय यांनी मानवी हक्क आयोगाकडे तक्रार केली आहे. सदर प्रकरणाची चौकशी करून या दोषी असणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी आयोगाकडे केली आहे.

मध्य रेल्वेच्या मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ सोमवारी सकाळी लोकलच्या दारात उभे राहून प्रवास करणारे १३ प्रवासी खाली कोसळून अपघात घडला होता. या अपघातात चार जणांना आपले प्राण गमवावे लागले तर अन्य ९ जण जखमी झाले आहेत. मात्र या घटनेमुळे संपूर्ण राज्यासह शहर ही हादरून गेले होते.

मुंब्रा येथे घडलेली दुर्घटना ही रेल्वे प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे घडली असल्याचे आरोप आता करण्यात येत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी व संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी वसईत राहणारे मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता आशिष राय यांनी मानवी हक्क आयोगात धाव घेतली आहे. या दुर्घटनेत निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. या घटनेला रेल्वे अधिकारी व व्यवस्थापन जबाबदार असल्याचे आशिष राय यांनी दिलेल्या तक्रारीत सांगितले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापूर्वी सुद्धा अशा अनेक घटना रेल्वेच्या अपघाताच्या घडल्या आहेत. त्यातून रेल्वेने बोध घेऊन योग्य त्या उपाययोजना आखणे आवश्यक आहे. मात्र तसे होत नसल्याने अशा घटना समोर येत आहेत. या घडलेल्या रेल्वे दुर्घटनेची सखोल चौकशी व्हावी यात जे अधिकारी व व्यवस्थापन जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राय यांनी राज्य मानवी हक्क आयोगाकडे तक्रारीद्वारे केली आहे.