Mumbai News : महाविकास आघाडीमध्ये कुठलीही बिघाडी नाही. उलट महायुतीत बिघाडी आहे त्यामुळेच त्यांना उमेदवार सापडत नाहीत असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. तर दुसरीकडे विजय वडेट्टीवार यांनी कंगनावर गोमांस खाण्याचा जो आरोप केला होता त्यावर कंगनाने प्रत्युत्तर दिलं आहे. तसंच विजय वडेट्टीवार यांनी संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळावा अशी आठवणही करुन दिली आहे. महाविकास आघाडीत त्यामुळे सगळं काही ऑल इज वेल आहे का? हा प्रश्नही चर्चेत आहे. अशात आता संजय राऊत यांनी आम्ही जास्तीत जास्त जागा जिंकू, आघाडी म्हटलं की काही गोष्टी होत असतात मात्र बिघाडी नाही असं म्हटलं आहे. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही प्रचाराचा धडाका सुरु केला आहे. आज दुसऱ्या टप्प्यासाठी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. या आणि अशा सगळ्या घडामोडींवर आपली नजर असणार आहे लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून.