|
|
'A Pack of Lies' शर्मिला फडके - शनिवार, २६ जून २०१०
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
उर्मिला देशपांडेचं पहिलंच पुस्तक 'A Pack of Lies' वाचलं. त्यामागे दोन कारणे- एक तर उर्मिला ही गौरी देशपांडेंची मुलगी आणि दुसरं म्हणजे उर्मिला किंवा जाहिरात क्षेत्रात जिला ‘उम्मी’ म्हणून ओळखलं जातं, ती एकेकाळी यशस्वी मॉडेल होती. उर्मिला कसं लिहितेय, यापेक्षा ती काय लिहितेय, याबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता होती.उर्मिलाचं पुस्तक हे माझ्या दृष्टीने गेल्या काही वर्षांतलं एकमेव पुस्तक ठरलं, जे मी वाचायला सुरुवात केली आणि संपल्याशिवाय खाली ठेवूच शकले नाही.
वाचल्यानंतरही बराच काळ भयंकर अस्वस्थतेमध्ये गेले. जरी पुस्तक चांगलं लिहिलेलं असलं तरी पुस्तकाचा दर्जा, कथानक, भाषा याचा माझ्या अस्वस्थतेशी अजिबात संबंध नाही. उर्मिलाचं हे पुस्तक ‘फिक्शन’मध्ये मोडत असलं तरी नि:संशयपणे त्यातली ‘जिनी’ ही स्वत:ची गोष्टच सांगतेय. गौरीच्या ‘मी’मधून जशी प्रत्येक वेळी स्वत: गौरीच डोकावत राहिली, तसंच हे. उर्मिलाच्या प्रत्येक शब्दातून, वाक्यातून, तिने कथन केलेल्या घटनांमधून या पुस्तकात तिचे तिच्या आईसोबतचे गुंतागुंतीचे संबंध उलगडत जातात आणि मग या पुस्तकातून उर्मिलाची आई म्हणून जी गौरी देशपांडे दिसत राहिली, त्यामुळे मी अस्वस्थ झाले. नुसतीच अस्वस्थ झाले नाही, तर मुळापासून हलून गेले. गौरी देशपांडेचं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व, वैयक्तिक स्वातंत्र्याबद्दलचा तिचा आग्रह, तिचं तिने स्वत:च्या अटींनुसार जगलेलं आयुष्य, मुक्त विचार, तिची तर्ककठोर भूमिका, तिची बौद्धिक पातळी, संवेदनशीलता या गोष्टींची भुरळ पडली नाही अशी मराठी वाचक स्त्री बहुधा नसेलच. गौरीचे देश-विदेश फिरणे, तिच्या आयुष्यातले समजूतदार पुरुष, मुलांना तिने दिलेले वैचारिक आणि इतर स्वातंत्र्य, तिच्या आयुष्यातला नंतरच्या काळातला एकटेपणा, तिचे व्यसनाकडे झुकत जाणे याबद्दल सर्वानी आस्थेने, कुतूहलाने जाणून घेतले. बहुतेकदा ते तिच्याच कथानकांमधून सामोरे आले. काही तिच्यावर लिहिल्या गेलेल्या लेखांमधून आपल्याला कळले. मात्र, उर्मिलाच्या पुस्तकातली नायिका ‘जिनी’ जेव्हा हेच आयुष्य एका मुलीच्या चष्म्यातून, तिच्या दृष्टिकोनातून आपल्यासमोर आणते आणि जिनीच्या आयुष्याची जी फरफट झाली, तिचे आयुष्य असंख्य चुकांच्या मालिकेमधून फिरत राहिले, उधळले गेले, न्यूनगंड, असुरक्षिततेत भिरकावले गेले, त्या साऱ्याला कळत-नकळत तिच्या आईचे आयुष्य, तिचा स्वभाव जबाबदार आहे, हे ती दाखवत राहते. आणि तेव्हा आपली आतापर्यंतची गौरीबाबतची सारी गृहितके हलून जातात. या पुस्तकातली जिनीची आई ही लेखिका आहे आणि तिचे संपूर्ण व्यक्तिमत्त्व गौरीवर बेतलेले आहे. जिनीच्या आईचा घटस्फोट, लहान मुलीला एकटय़ाने, कमी पैशांमध्ये वाढवताना तिची होत असलेली ओढाताण, नकळत जिनीकडे झालेले दुर्लक्ष, तिचा आत्ममग्नपणा, तर्ककठोर वृत्ती, बुद्धिवाद, जिनीला सावत्र बापासोबत जुळवून घेताना झालेला त्रास, तिच्या मनातील अनेक गंड, ते समजून घ्यायला आईचे कमी पडणे, जिनीने सावत्र बापावर केलेले आरोप, आईने तिच्यावर केलेला खोटेपणाचा आरोप, शिक्षण अर्धवट सोडल्याबद्दलची, ड्रग्ज घेत असल्याबद्दलची आईची नाराजी, धाकटय़ा बहिणीला घेऊन आईचे नवऱ्यासोबत जपानला निघून जाणे आणि मग पुढचे जिनीचे बेबंद होत गेलेले आयुष्य, त्यातून तिचे कसेबसे स्वत:ला सावरणे आणि नंतर मग स्वत:च व्यसनाधीन होत चाललेल्या आईला समजावून घेत सावरायचा अयशस्वी प्रयत्न करणे, हे सारे वाचताना मला ‘अरे, हे तर गौरीच्याही कथानकांमधून वेळोवेळी दिसत राहिले आपल्याला; पण किती वेगळे रंग होते त्याला..’ असं सतत वाटत राहिलं. महाराष्ट्राच्या दुष्काळी भागात असलेल्या आईच्या फार्महाऊसबद्दल, जिनीला तिथे राहताना येत असलेल्या कंटाळ्याबद्दल, तिच्या आईच्या मनात त्यामुळे दाटून येत असलेल्या चिडचिडीबद्दल वाचताना तर घशात आवंढा येतो. गौरीचे ते लाडके ‘विंचुर्णी’चे घर, तिथला तलाव.. मला ते सारे दिसायला लागले. स्वतंत्र, बुद्धिवादी व्यक्तिमत्त्वाची आई आणि तिची सामान्य प्रेमाची अपेक्षा करणारी आणि ते लाभत नाही म्हणून खंतावत राहणारी तिची मुलगी या दोघीही आपापली आयुष्यं इतकी गुंतागुंतीची करत जगत राहतात. कुणाचे योग्य आणि कुणामुळे कुणाचे आयुष्य उद्ध्वस्त होते, याचा निर्णय आपण कसा घेणार? गौरीच्या ‘चन्द्रिके ग, सारिके ग’मधले आई-मुलींमधले ते संवाद जिनीच्या लेखणीतून वाचताना क्षणभर कसे ‘रिअॅक्ट’ व्हायचे, हे कळत नाही. आईच्या शेवटच्या दिवसांमध्ये जिनी आईसोबत नव्याने जोडली जाते. आईकडे एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून बघता येण्याइतकी परिपक्वता जिनीमध्ये आलेली असते. आईचे स्थान एक लेखिका म्हणून किती वरचे होते, लोकांच्या मनात तिची प्रतिमा किती वेगळी होती, हे सारे पहिल्यांदाच जाणून घेताना जिनी चकित होते आणि आपल्याला उगीचच आनंद होतो की, गौरीला तिच्या लेकीने घेतले समजून एकदाचे! उर्मिला या पुस्तकात लिहिते, ‘मीसुद्धा लिहू शकते, हे आईला कळले असते तर तिला खूप आनंद वाटला असता. तिने माझे पुस्तक वाचायला हवे होते, असे मनापासून वाटते. मात्र, हेही तितकंच खरं, की आई असती तर हे पुस्तक मी लिहूच शकले नसते. इतकं खरं आयुष्यात पहिल्यांदाच माझ्याकडून सांगितलं गेलंय, ते सांगू शकले नसते.’ गौरीच्या ‘एकेक पान गळावया’मधली राधा यावर काय म्हणाली असती, हाच विचार पुस्तक संपवताना मनात डोकावून गेला. मुलांना वाढवताना आपण आपल्या मते, खूप आदर्श आई आहोत, अशी आपल्याला खात्री असली आणि आपण त्यावर कितीही खूश असलो, तरी हे सगळं करताना आपण मुलांना विचारायचं विसरूनच जातो बहुधा- की बाबांनो, नक्की कशा प्रकारची आई हवीशी वाटतेय तुम्हाला?
|
|
लोकरंग
साहित्यव्यवहाराचा बोन्साय होतो आहे! साहित्य व्यवहार समीक्षा प्रकाशन संमेलने महामंडळ अरुण जाखडे , रविवार, २९ ऑगस्ट २०१०
साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अनेक चर्चा, वाद, आरोप, प्रत्यारोप सतत होत आलेले आहेत. ज्यांचा साहित्याशी काही संबंध नाही असेही लोक उत्सुकतेपोटी, कधी भाबडेपणाने, कधी उपहासाने, तर कधी पोटतिडिकीने बोलताना आपण पाहतो. माध्यमातून मिळणारी प्रसिद्धी, समाजाचा, शासनाचा व शासनमान्य संस्थांचा पैसा संमेलनाला मिळत असल्यामुळे त्यांनी असे काही बोलण्यात चूक नाही. गेल्या शंभर वर्षांची परंपरा असलेल्या या साहित्य संमेलनाची कार्यपद्धती आज पुन्हा एकदा तपासून घेणे, त्याचे पुनर्मूल्यांकन करणे आणि हा सोहळा अधिक पारदर्शी होणे- यासाठी काही ठोस निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे. |
दिनदर्शिका
दिनांक ३ सप्टेंबर २०१०. शुक्रवार, मिती श्रावण वद्य नवमी ९ क. ५१ मि.पर्यंत, मृग नक्षत्र १२ क. ३२ मि.पर्यंत, मिथुन चंद्र. सूर्योदय-६/२५, सूर्यास्त- ६/५१. मेष - प्रिय आप्तांच्या भेटी होतील, वृषभ - अचानक उधारी वसूल होईल, मिथुन - प्रयत्नांती परमेश्वर, कर्क - धावपळ गर्दीचा दिवस, सिंह - पेचप्रसंग सुटतील, कन्या - नवीन प्रयोगात यश, तूळ - महत्त्वाची कामे होतील, वृश्चिक - चकमकी टाळा, धनू - शुभवार्ता समजतील, मकर - शुक्लकाष्टे मागे लागतील, कुंभ - महत्त्वाचा दस्तऐवज सापडेल, मीन - निर्धाराने पुढे चला. शुभराशी : कन्या, तूळ, धनू.
|